Asia Cup 2025 Super 4 Points Table : आशिया कपच्या सुपर-4 सामन्यात भारताने बुधवारी बांगलादेशवर मोठा विजय मिळवत थेट फायनलमध्ये प्रवेश केला. टीम इंडियाच्या या शानदार विजयामुळे गुणतालिकेत चांगलीच उलथापालथ झाली आहे. कारण श्रीलंका स्पर्धेतून बाहेर पडली आहे, तर पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन संघात एका जागेसाठी शर्यत रंगली आहे.
टीम इंडियाच्या विजायानंतर पॉइंट्स टेबलमध्ये उलथापालथ (Asia Cup 2025 Super 4 Points Table Update)
भारताच्या या विजयामुळे सुपर-4 मध्ये टीम इंडियाने दोन सामन्यांत दोन विजय मिळवत 4 गुणांसह अव्वल स्थान कायम ठेवले आणि फायनलमध्ये जागा पक्की केली. पाकिस्तान आधीप्रमाणे दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर बांगलादेश तिसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेचा प्रवास यानंतर संपला आहे आणि ते आता फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. गुरुवारी पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामना अक्षरशः उपांत्य फेरीसारखा ठरणार आहे. कारण, जो जिंकेल त्याला फायनलमध्ये संधी मिळेल, तर हरलेल्याचा आशिया कपमधील प्रवास संपेल.
आशिया कपचा पहिला फायनलिस्ट भारतीय संघ (India qualifies for final Asia Cup 2025)
भारताने अजिंक्य कामगिरी करत आशिया कपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. सुपर-4 टप्प्यात भारताचा अजून एक सामना बाकी आहे, जो 26 सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय संघासाठी सरावाचा ठरेल, ज्यात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम आपली फलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी सुधारण्याचा प्रयत्न करेल. सुपर-4 च्या गुणतालिकेत भारत चार गुण आणि 1.357 नेट रन रेटसह अव्वल स्थानी आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. या दोन्ही संघांमध्ये गुरुवारी "नॉकआऊट" सामना रंगणार असून, ज्या संघाचा विजय होईल तो 28 सप्टेंबर रोजी भारताविरुद्ध फायनल खेळणार आहे. चौथ्या स्थानावर असलेल्या श्रीलंकेला सुपर-4 मधील दोन्ही सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे.
भारत आणि बांगलादेश सामन्यात काय घडलं? (What happened in India vs Bangladesh match?)
नाणेफेक जिंकून बांगलादेशने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, अभिषेक शर्मा याने तुफानी फलंदाजी करत फक्त 37 चेंडूत 75 धावा ठोकल्या. त्याला हार्दिक पांड्याने 38 धावांची साथ दिली आणि भारताने 6 गडी गमावत 168 धावांचा भक्कम डोंगर उभा केला. प्रत्युत्तर, जसप्रीत बुमराहने सुरुवातीलाच बांगलादेशला धक्का दिला आणि नंतर कुलदीप यादव व वरुण चक्रवर्ती यांच्या फिरकीच्या जाळ्यात अडकून बांगलादेशाची संपूर्ण टीम 127 धावांत गुंडाळली. भारताने 41 धावांनी मोठा विजय मिळवला.
हे ही वाचा -