India vs Nepal Asia Cup 2023 : भारत आणि नेपाळ यांच्यातील सामना कँडी येथील पल्लेकल स्टेडिअमवर होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतही याच मैदानावर शनिवारी झाली होती. पण पावसाच्या व्यत्यायामुळे सामना रद्द करावा लागला होता. भारताने प्रथम फलंदाजी करताना २६६ धावांपर्यंत मजल मारली होती. पाकिस्तानच्या फलंदाजीवेळी पावसाने खोडा घातला. त्यामुळे सामना रद्द करण्याचा निर्णय पंचांनी घेतला. भारताच्या दुसऱ्या साखळी सामन्यावरही पावसाचे संकट ओढावले आहे. भारत आणि नेपाळ यांच्यात सोमवारी होणाऱ्या सामन्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार,  पल्लेकल येथे दिवसाची सुरुवातच पावसाने होणा आहे. सकाळी आठ वाजता हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुपारी दोन वाजता मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भारत आणि नेपाळ यांच्यातील सामना तीन वाजता सुरु होणार आहे. अडीच वाजता नाणेफेक होणार आहे. पावसामुळे सामन्यात व्यत्यय येण्याची शक्यता आहे. दुपारी पावसाने विश्रांती घेती नाही, तर नाणेफेकीला उशीर होईल. त्याशिवाय, दिवसभर पावसाने खोडा घातल्यास सामना रद्दही होऊ शकतो. डकवर्थ लुईस नियमांनुसार, प्रत्येकी २०-२० षटकांचा खेळ होणं गरजेचं आहे. पावसामुळे जितका वेळ वाया जाईल, तितके षटके कपात केली जाऊ शकतात.  



दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे प्रभावित झाला होता. सामन्यापूर्वी मुसळधार पाऊस झाला होता. सामना सुरु होण्यापूर्वी पावसाने उसंत घेतली होती. पहिला डाव व्यवस्थित झाल्यानंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. दोन्ही संघाला प्रत्येकी एक एक गुण देण्यात आला होता. पाकिस्तान संघाने सुपर ४ मध्ये प्रवेश केला आहे.   


कँडीमध्ये सोमवारी सकाळी 60 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नाणेफेकीवेळी म्हणजे दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान पावसाची शक्यता २२ टक्के इथकी आहे. पण संध्याकाळी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. संध्याकाळी ६६ टक्के पावसाची शक्यता आहे. त्यामुळे भारत आणि नेपाळ यांच्यातील सामन्यात पावसाचा खेळ होऊ शकतो.



भारतासाठी आता करो या मरोची लढाई - 



पाकिस्तानविरोधातील सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे आता भारतापुढे करो या मरोची स्थिती झाली आहे. सुपर 4 मध्ये प्रवेश करण्यासाठी भारताला नेपाळचा पराभव करणं अनिवार्य आहे. अथवा सामना पावसामुळे रद्द झाल्यास भारतीय संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करेल. नेपाळने अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवल्यास भारताचे आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताला विजय अनिवार्य आहे. पाकिस्तानविरोधात नेपाळच्या गोलंदाजांनी सुरुवातीला भेदक मारा केला होता. त्यामुळे नेपाळ संघाला हलक्यात घेण्याची चूक टीम इंडिया करणार नाही.  भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये 4 सप्टेंबर रोजी पल्लेकेले स्टेडिअमवर अखेरचा साखळी सामना होणार आहे. यातील विजेता संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करेल.