Arjun Tendulkar : लग्न झालं, अक्षता डोक्यावर पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी अर्जुन तेंडुलकर मैदानात, चाहत्यांच्या अपेक्षाभंग; वैभव सूर्यवंशीही ठरला फेल
Arjun Tendulkar Saaniya Chandhok Wedding : डावखुरा अष्टपैलू खेळाडू अर्जुन तेंडुलकरने 5 मार्च रोजी मुंबईत सानिया चंडोकसोबत लग्न केलं.

Arjun Tendulkar News : खेळाडू आपल्या खेळाबद्दल किती वेडे असतात, याची अनेक उदाहरणे वेळोवेळी पाहायला मिळतात. भारतीय संघाचा स्टार क्रिकेटपटू रिंकू सिंग वडिलांच्या निधनानंतरही टी-20 वर्ल्ड कपसाठी संघात सामील झाला होता. तर काही खेळाडू महत्त्वाचे कौटुंबिक कार्यक्रमही सोडून मैदानात उतरतात. महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर अजून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थिरावलेला नसला तरी खेळाबद्दलची त्याची जिद्द मात्र तितकीच जबरदस्त आहे. म्हणूनच लग्नाच्या अवघ्या 24 तासांतच तो आपल्या संघासाठी मैदानात उतरला.
लग्नानंतर 24 तासांतच मैदानात
डावखुरा अष्टपैलू खेळाडू अर्जुन तेंडुलकरने 5 मार्च रोजी मुंबईत सानिया चंडोकसोबत लग्न केलं. या लग्नसमारंभाला भारतीय क्रिकेटविश्वातील अनेक दिग्गजांसह उद्योग आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित होते. हा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला आणि अपेक्षेप्रमाणे त्याची जोरदार चर्चा देखील झाली. मात्र आता चर्चेत आहे ती अर्जुनची खेळाबद्दलची जिद्द. लग्नाला अवघे 24 तासही पूर्ण झाले नव्हते आणि अर्जुन पुन्हा एकदा आपल्या संघाची जर्सी घालून मैदानात उतरला.
🚨 The dedication level of Arjun Tendulkar:
— Selfless⁴⁵ (@SelflessCricket) March 6, 2026
5th March - He got married to Saaniya Chandhok in Mumbai.
6th March Today - He has played Semi-final for DY Patil Blue vs Mumbai Customs.
People often troll Arjun Tendulkar and say he gets chances only because of his father’s name.… pic.twitter.com/xYWB6en7q9
जर हा सामना आंतरराष्ट्रीय क्रिकेट, देशांतर्गत स्पर्धा किंवा आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धेचा असता तर कदाचित एवढे आश्चर्य वाटले नसते. मात्र अर्जुनने मुंबईतील डीवाय पाटील टी-20 ट्रॉफी या स्थानिक पण महत्त्वाच्या स्पर्धेत पुनरागमन केले. या हंगामात तो डीवाय पाटील ब्लू संघाकडून खेळत होता आणि लग्नाआधीच्या सामन्यांत त्याने संघासाठी महत्त्वाचे योगदानही दिले होते. त्यामुळे लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी संघाचा उपांत्य फेरीचा सामना असल्याने अर्जुन मैदानात उतरण्यास सज्ज झाला.
अर्जुन आणि वैभव दोघेही अपयशी, संघाचा पराभव
मात्र, हा सामना अर्जुन आणि त्याच्या संघासाठी फारसा यशस्वी ठरला नाही. उपांत्य फेरीत डीवाय पाटील ब्लूचा सामना मुंबई कस्टम्सशी झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ब्लू संघाला 20 षटकांत 156 धावांपर्यंतच मजल मारता आली.
या संघात युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी देखील होता. मागील सामन्यात त्याने अवघ्या 19 चेंडूत 67 धावांची तुफानी खेळी केली होती. मात्र या वेळी तो काही खास कामगिरी करू शकला नाही आणि 3 चेंडूत खातेही न उघडता बाद झाला. अर्जुन तेंडुलकरलाही केवळ 9 धावा करता आल्या. संघाकडून कर्णधार शशांक सिंहने 24 चेंडूत 42 धावांची सर्वाधिक खेळी केली.
156 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई कस्टम्सने आक्रमक फलंदाजी करत 16 षटकांतच लक्ष्य गाठले आणि अंतिम फेरीत स्थान मिळवले. गोलंदाजीतही अर्जुनचा दिवस खराब ठरला. त्याने टाकलेल्या एका षटकात तब्बल 20 धावा दिल्या.
हे ही वाचा -




















