BCCI First Reaction On Virat Kohli Test Retirement : इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा झाल्यानंतर नवीन कर्णधाराची प्रतीक्षाही संपली. बीसीसीआयने 25 वर्षीय शुभमन गिलला कसोटी संघाचा नवा कर्णधार आणि ऋषभ पंतला उपकर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी शनिवारी संघाची घोषणा केली. आगरकरने यावेळी कबूल केले की, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीमुळे पोकळी भरून काढणे कठीण आहे. इंग्लंड दौऱ्यावर इतर खेळाडू जबाबदारी घेतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
विराट कोहलीच्या निवृत्तीबद्दल बीसीसीआयने काय म्हटले?
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आज शनिवारी पत्रकार परिषदेसाठी आले. यामध्ये, सर्वप्रथम भारतीय क्रिकेट संघाच्या आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी संघाची घोषणा करण्यात आली. यानंतर अजित आगरकर यांनी विराटच्या निवृत्तीबद्दल सांगितले की, कोहलीने एप्रिलच्या सुरुवातीलाच बीसीसीआयला कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीबद्दल माहिती दिली होती. विराटने सांगितले होते की त्याने कसोटीतून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी 18 सदस्यीय संघाची घोषणा केल्यानंतर अजित आगरकर म्हणाले, 'क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू निवृत्त होतात, तेव्हा ती जागा भरणे नेहमीच कठीण असते. त्याची जागा भरणे हे एक मोठे काम आहे. पण त्याकडे पाहण्याचा एक मार्ग म्हणजे ती इतरांसाठी एक संधी आहे.' या दोन सुपरस्टार्सच्या जागी, युवा डावखुरा साई सुदर्शन आणि अनुभवी करुण नायर यांना संघात स्थान देण्यात आले आहे. आगरकरने खुलासा केला की, कोहलीने गेल्या महिन्यात कदाचित चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर संपर्क साधला होता आणि कसोटी क्रिकेट सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती.
आगरकरांनीही मिसळला गंभीरच्या सुरात सूर...
इंग्लंड दौऱ्यापर्यंत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना राहण्यासाठी राजी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता का? या प्रश्नावर आगरकर म्हणाले की, आगामी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी (2025-27) नवीन संघ तयार करणे हे प्राधान्य आहे. काही दिवसाआधी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाले होते की, “जेव्हा एखादा खेळाडू निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतो, तेव्हा तो त्याचा निर्णय असतो. निवृत्ती हा वैयक्तिक निर्णय आहे. हे नवीन जागतिक कसोटी अजिंक्यपद चक्र आहे आणि आम्ही संघ तयार करण्यास मदत करण्यासाठी सर्व गोष्टींकडे लक्ष देत आहात.
गेल्या एका वर्षात झालेल्या निराशाजनक कामगिरीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांच्याही भविष्याबद्दल अटकळ बांधली जात होती. विशेषतः ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 2024-25, त्याच्या कसोटी कारकिर्दीबद्दल प्रश्न उपस्थित केले गेले. कोहलीने पर्थमध्ये शतक झळकावून शानदार सुरुवात केली, पण नंतर त्याची बॅट शांत झाली आणि दौऱ्याच्या शेवटी, तो पाच कसोटी सामन्यांमध्ये 23 च्या सरासरीने केवळ 190 धावा करू शकला. पहिल्या कसोटीनंतर रोहित संघात सामील झाला, परंतु त्याची कामगिरीही निराशाजनक होती आणि त्याने पाच कसोटी डावांमध्ये 6.2 च्या सरासरीने फक्त 31 धावा केल्या. सिडनीतील पाचव्या आणि अंतिम कसोटीलाही तो मुकला.
