Afghanistan vs Pakistan War Three Cricketers Killed: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या सीमारेषेवर सुरु असलेल्या लष्करी संघर्ष आता प्रचंड चिघळला आहे. पाकिस्तानने शुक्रवारी अफगाणिस्तानच्या (Afghanistan) पक्तिका प्रांतामध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात तीन क्रिकेटपटू ठार झाले. या घटनेमुळे संपूर्ण क्रिकेटविश्वात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यासोबत होणाऱ्या टी-20 तिरंगी मालिकेतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. ही मालिका नोव्हेंबर महिन्यात होणार होती. मात्र, अफगाणिस्तानने या स्पर्धेतून माघार घेत क्रिकेट आणि रक्तपात एकत्र नांदू शकत नाही, असा रोखठोक संदेश दिला आहे. ( Afghanistan vs Pakistan War news)

Continues below advertisement


अफगाणिस्तानी क्रिकेट बोर्डाच्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अगोदरच वाळीत पडलेल्या पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाची चांगलीच गोची होणार आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेला (ICC) एक पत्र लिहले होते. यामध्ये त्यांनी म्हटले होते की, अफगाणिस्तानने तिरंगी स्पर्धेतून माघार घेतली तर पर्यायी योजना तयार ठेवावी. मात्र, तीन उदयोन्मुख क्रिकेटपटूंचा पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर अफगाणिस्तानने या तिरंगी क्रिकेट स्पर्धेतून माघार घेतली. त्यामुळे आता ही मालिकाच रद्द होऊ शकते. तसे झाल्यास पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. यावर आता पाकिस्तान काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.




Rashid Khan slams Pakistan: राशिद खान पाकिस्तानवर संतापला


पाकिस्तानच्या हल्ल्यात तीन क्रिकेटपटूंचा मृत्यू झाल्यानंतर अफगाणिस्तानचा आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेला क्रिकेटपटू राशिद खान याने संताप व्यक्त केला. त्याने म्हटले की, पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानमधील नागरिकांचा मृत्यू झाला आहे, त्याबद्दल मला अतीव दु:ख झाले आहे. या हल्ल्यात महिला, लहान मुले आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न असणाऱ्या उदयोन्मुख क्रिकेटपटूंचा मृत्यू झाला आहे. नागरी वस्त्यांना लक्ष्य करण्याचे पाकिस्तानचे हे कृत्य अनैतिक आणि नृशंस स्वरुपाचे आहे. पाकिस्तानच्या या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कृतीकडे कदापि दुर्लक्ष करता कामा नये. पाकिस्तानविरुद्धच्या आगामी तिरंगी क्रिकेट मालिकेतून माघार घेण्याच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. मी या कठीण काळात अफगाणिस्तानच्या लोकांसोबत उभा आहे. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा आमच्या देशाची प्रतिष्ठा ही सर्वोच्च आहे, असे राशिद खानने ट्विटमध्ये म्हटले आहे.


आणखी वाचा


अफगाणिस्तानच्या क्रिकेटमधील 3 उगवते तारे पाकड्यांच्या हल्ल्यात मारले गेले, राशिद खान संतापून म्हणाला, पाकिस्तान...