Abhishek Sharma T20 World Cup 2026: आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या (T20 World Cup 2026) अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड (Ind vs NZ Final) यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने तब्बल 96 धावांनी विजय मिळवला. भारताने सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं.
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) फक्त 21 चेंडूत 52 धावा केल्या. अभिषेकने स्फोटक खेळीत सहा चौकार आणि तीन षटकार मारले. अभिषेकने फक्त 18 चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. टी-20 विश्वचषक इतिहासातील हे तिसरे सर्वात जलद अर्धशतक ठरले. अभिषेक शर्माने संजू सॅमसनसह भारताला चांगली सुरुवात दिली. दोन्ही फलंदाजांनी पॉवरप्लेमध्ये 96 धावा जोडल्या. या आक्रमक सुरुवातीने भारताच्या मोठ्या धावसंख्येचा मजबूत पाया रचला. मात्र अभिषेकच्या या खेळीमागील एक रहस्य समोर आले आहे. (Abhishek Sharma T20 World Cup 2026)
न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात अभिषेक शर्माने (Abhishek Sharma T20 World Cup 2026) स्वतःच्या बॅटचा वापर न करता अष्टपैलू शिवम दुबेच्या बॅटचा वापर केला. सामन्यानंतर, त्याने अंतिम सामन्याच्या सकाळी काहीतरी नवीन करण्याचा निर्णय घेतल्याचे उघड केले. अभिषेक म्हणाला, मी शिवम दुबेच्या बॅटने फलंदाजी केली, म्हणून त्याचे आभार. सकाळी मला वाटले की मी काहीतरी करून पाहावे. शुभमन गिल तिथे नव्हता, म्हणून मी शिवम दुबेकडे गेलो आणि त्याची बॅट घेतली. हीच शिवम दुबेकडून उधारीने घेतलेली बॅट अभिषेक शर्मासाठी Lucky ठरली.
सलग तीन सामन्यात अभिषेक शर्मा शून्यावर बाद- (Abhishek Sharma Bat Change)
टी-20 विश्वचषक 2026ची स्पर्धा अभिषेक शर्मासाठी एकंदरीत चांगली नव्हती. अभिषेक शर्मा टी-20 विश्वचषक 2026 च्या पहिल्या तीन सामन्यात शून्यावर बाद झाला. यामुळे अभिषेक शर्मावर विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले. तथापि, भारतीय संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर विश्वास कायम ठेवला. अभिषेक म्हणाला की त्याच्या सहकाऱ्यांचा विश्वास ही त्याची सर्वात मोठी ताकद आहे.
गेल्या महिन्यापासून मी कठीण काळातून जात आहे- अभिषेक शर्मा (Abhishek Sharma In T20 World Cup 2026)
अभिषेक शर्मा म्हणाला, गेल्या महिन्यापासून मी कठीण काळातून जात आहे. अशा काळात, तुमच्या आजूबाजूचे लोक खूप महत्त्वाचे असतात. मी धावा काढत नसतानाही, संघातील प्रत्येकजण माझ्यावर विश्वास ठेवत होता. ते म्हणत राहिले, मी नक्कीच चांगले करेन. शेवटी, अभिषेक शर्माने सिद्ध केले की महान खेळाडू तेच असतात जे अंतिम सामन्यासारख्या मोठ्या सामन्यात दमदार खेळी खेळून मोठ्या मंचावर चमकतात.
