Abhimanyu Easwaran fails India A vs England Lions : भारत अ संघ आणि इंग्लंड लायन्स यांच्यातील दोन अनधिकृत कसोटी सामन्यांची मालिका शुक्रवार 30 मे 2025 पासून सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना कँटरबरी येथील सेंट लॉरेन्स ग्राउंडवर खेळवला जात आहे. खरंतर, या मालिकेचा उद्देश आगामी भारत-इंग्लंड कसोटी मालिकेसाठी खेळाडूंना तयारीची संधी देणे आणि संघ निवडीसाठी संभाव्य खेळाडूंच्या कामगिरीचे मूल्यमापन करणे आहे.
या मालिकेत रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर ओपनर फलंदाजाच्या जागेसाठी अभिमन्यू ईश्वरनचाही संघात समावेश करण्यात आला आहे. तो संघाचा बॅकअप ओपनर आहे, त्यामुळे इंग्लंड लायन्सविरुद्धच्या सामन्यांमध्ये यांच्याकडून अपेक्षा होत्या. परंतु त्यांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून आला आणि तो स्वस्तात बाद झाला.
सहाव्या षटकात कर्णधार अभिमन्यू स्वस्तात तंबुत...
इंग्लंड लायन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताला सहाव्या षटकातच पहिला धक्का बसला. कर्णधार अभिमन्यू ईश्वरन स्वस्तात बाद झाला. षटकाच्या पाचव्या चेंडूवर अभिमन्यूला जोश हॉलने एलबीडब्ल्यू आऊट केले. त्याने 17 चेंडूत 8 धावा केल्या आणि यादरम्यान 2 चौकार मारले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या या पठ्ठ्याची बॅट परदेशी मैदानांवर पुन्हा एकदा शांत राहिली.
अभिमन्यू ईश्वरनला स्वतःला सिद्ध करण्यासाठी अजून 3 संधी
इंडिया-अ ला इंग्लंड लायन्ससोबत २ प्रथम श्रेणी सामने खेळायचे आहेत. अशा परिस्थितीत, अभिमन्यू ईश्वरनला स्वतःला सिद्ध करण्यासाठी चार डाव आहेत, त्यापैकी त्याचा पहिला डाव वाया गेला आहे. जर तो पुढच्या डावात स्वतःला सिद्ध करू शकला नाही, तर केएल राहुल किंवा साई सुदर्शनसारखा खेळाडू सलामीवीर होण्याच्या शर्यतीत त्याला मागे टाकेल. अभिमन्यू ईश्वरनने आतापर्यंत 101 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 7,774 धावा केल्या आहेत. त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत 27 शतके आणि 29 अर्धशतकेही त्याच्या बॅटमधून आली आहेत.
रोहित शर्माची जागा घेण्यासाठी 'हे' खेळाडूं शर्यतीत...
रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारताच्या कसोटी संघात युवा खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुभमन गिल यांना नवीन कसोटी कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले असून, साई सुदर्शनला पहिल्यांदाच कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. सुदर्शन आयपीएलमध्ये आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे, ज्यामुळे त्याला ही संधी मिळाली. यानंतर, अभिमन्यू ईश्वरन आणि साई सुदर्शन सारख्या उदयोन्मुख खेळाडूंना सलामीवीर फलंदाजासाठी पर्याय म्हणून पाहिले जात होते. अशीही अटकळ आहे की कर्णधार गिल स्वतः सलामीला येऊ शकतो.
