बर्मिंगहॅम : चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत आणि बांगलादेश संघांमध्ये आज उपांत्य सामना बर्मिंगहॅमच्या एजबस्टनवर खेळवण्यात येईल.


चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रणांगणात बलाढ्य न्यूझीलंडवर मिळवलेल्या विजयाने बांगलादेशचा आत्मविश्वास टीपेला पोहोचला आहे. आता विराट कोहलीच्या टीम इंडियाला त्याच बांगलादेशचा सामना करायचा आहे.

या सामन्याला आज दुपारी तीन वाजता सुरुवात होणार आहे. भारताने जर आज बांगलादेशला हरवलं तर क्रिकेट रसिकांनी भारत विरुद्ध पाकिस्तान अशी ड्रीम फायनल येत्या रविवारी बघायला मिळेल.

टीम इंडिया भारी
वास्तविक कागदावरच काय, पण मैदानावरही विराट कोहलीची टीम इंडिया बांगलादेशच्या तुलनेत लय भारी आहे.

इऑन मॉर्गनच्या इंग्लंडच्या बरोबरीने यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीत आपली ताकद दाखवून देणारा संघ कोणता असेल तर तो आहे टीम इंडिया. श्रीलंकेविरुद्धच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा आणि बोथट आक्रमणाचा अपवाद सोडला तर भारतीय शिलेदारांनी चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपल्या कामगिरीचा नेटका ठसा उमटवला आहे.

शिखर धवन, रोहित शर्मा आणि विराट कोहली सातत्याने धावा करत आहेत. युवराजसिंग आणि महेंद्रसिंह धोनीनेही संधी मिळताच आपलं उखळ पांढरं करुन घेतलं. आता बांगलादेशसमोरही आपली धावांची टांकसाळ पुन्हा उघडायला भारतीय फलंदाज उत्सुक असतील.

बांगलादेशची रणनीती
भारतीय फलंदाजांच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतल्या दादागिरीला वेसण घालण्यासाठी बांगलादेशने आपल्या वेगवान अस्त्रांचा वापर करण्याची रणनीती आखल्याची माहिती आहे. रुबेल हुसेन, टस्किन अहमद, मुस्तफिजूर रेहमान आणि मश्रफे मोर्तझा ही वेगवान चौकडी बर्मिंगहॅमच्या लढाईत भारतीय फलंदाजांवर चाल करुन जातील.

भारताची अस्त्रं
बांगलादेशच्या या वेगवान आक्रमणाला टीम इंडियाच्या भात्यात संमिश्र आक्रमणाचं उत्तर आहे. भारताच्या भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या आणि रवींद्र जाडेजाकडून
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात झालेल्या चुका त्यांनी दक्षिण आफ्रिकेसमोर सुधारलेल्या दिसल्या.
रवीचंद्रन अश्विननंही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात आपल्या ऑफ स्पिनच्या अस्त्राला धार काढून घेतली. बांगलादेशच्या संघातही तमिम इक्बाल, सौम्या सरकार आणि शकिब अल हसन यांच्यासारख्या डावखुऱ्या फलंदाजांचा भरणा आहे. त्यामुळे अश्विनचे हात नक्कीच शिवशिवत असतील.

टीम इंडियाचं दक्षिण आफ्रिकेविरुद्धचं क्षेत्ररक्षण इतकं चपळ होतं, की भारतीय क्षेत्ररक्षकांनी त्यांच्या तीन फलंदाजांना धावचीत केलं.

टीम इंडियाच्या फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातल्या याच सुधारित आवृत्तीने दक्षिण आफ्रिकेसारख्या नंबर वन टीमलाही साफ चिरडून टाकलं. विराट कोहली आणि त्याच्या शिलेदारांनी बर्मिंगहॅमच्या लढाईतही तोच फॉर्म कायम राखला तर बांगलादेशचं काही खरं नाही.

संबंधित बातम्या

बांगलादेशविरुद्ध टीम इंडिया सज्ज, फायनलपासून एक पाऊल दूर!

घरच्या मैदानावर इंग्लंड पराभूत, पाकिस्तानची फायनलमध्ये धडक


बांगलादेशने पुन्हा लायकी दाखवली, सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्टर्स


भारत आणि इंग्लंडमध्ये फायनल व्हावी, असंच सर्वांना वाटतं: विराट कोहली