तामिळनाडूत कावेरी आंदोलन पेटल्याने बीसीसीआयने हा निर्णय घेतला. होम ग्राऊंडवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सनसनाटी विजय मिळवत चेन्नईने घरच्या मैदानात पुनरागमन साजरं केलं. मात्र या सामन्यादरम्यान मैदानाबाहेर आंदोलकांनी गोंधळ घातला होता.
कावेरी पाणीवाटप लवादाची नियुक्ती करण्यासाठी तामिळनाडूतील राजकीय संघटनांनी आंदोलन सुरु केलं आहे. त्यामुळे आयपीएलला सुरक्षा पुरवली जाऊ शकत नाही, असं चेन्नई पोलिसांनी बीसीसीआयला कळवलं. त्यानंतर बीसीसीआयने उर्वरित सर्व सामने दुसरीकडे हलवण्याचा निर्णय घेतला.
कोलकात्याविरुद्धच्या सामन्यातही आंदोलनकर्त्यांनी गोंधळ घातला होता. मैदानाच्या दिशेने चप्पल फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला, ज्यानंतर पोलिसांनी तीन जणांना अटक केली.
सीएसकेचे होम ग्राऊंडवर एकूण सात सामने होणार होते, मात्र आता सुरक्षेच्या कारणामुळे हे सामने दुसऱ्या मैदानावर खेळवण्यात येतील. यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईने पहिल्या दोन्हीही सामन्यांमध्ये विजय मिळवला असून गुणतालिकेत अव्वल स्थान कायम ठेवलं आहे.