क्वालालंपूर : नेपाळपाठोपाठ आता भारताच्या अंडर-19 क्रिकेट संघाला बांगलादेशनंही 8 गडी राखून अंडर-19 आशिया कपमध्ये पराभूत केलं आहे. सलगच्या दोन पराभवामुळे भारत आशिया चषकातील पहिल्याच फेरीतून बाहेर पडला आहे.


गेल्या तीन दिवसातील भारतीय संघाचा हा दुसरा मोठा पराभव आहे. डिफेंडिंग चॅम्पियन असलेल्या भारतासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

पावसामुळे हा सामना 32 षटकांचा खेळवण्यात आला. बांगलादेशनं नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. पण भारताची सुरुवात म्हणावी तशी झाली नाही. 16व्या षटकापर्यंत भारतानं 85 धावांवर 4 गडी गमावले होते. भारताकडून साातव्या क्रमांकावर आलेल्या सलमाननं सर्वाधिक 39 धावा केल्या. शेवटच्या चार गड्यांनी भारतासाठी 71 धावा केल्या. 32 षटकामध्ये भारतानं 8 गड्यांच्या मोबदल्यात 187 धावांपर्यंत मजल मारली.

दरम्यान, बांगलादेशचा सलामीवीर पिनाक घोष (नाबाद 83) याच्या फलंदाजीच्या जोरावर बांगलादेशानं भारतावर दणदणीत विजय मिळवला. भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशचे दोन बळी झटपट बाद केले. पण त्यानंतर भारताला एकही गडी बाद करता आला नाही आणि बांगलादेशनं अगदी सहज विजय मिळवला.

दुसरीकडे नेपाळनं मलेशियावर मात करुन सेमीफायनलमध्ये जागा पटकावली आहे. 22 षटकांच्या या सामन्यात मलेशियाचा संपूर्ण संघ अवघ्या 45 धावांवर बाद झाला. त्यानंतर 5.2 षटकातच नेपाळनं मलेशियावर विजय मिळवला.