पुणे: पुणे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी टीम इंडियाची दाणादाण उडवली. कांगारुंनी भारताचा पहिला डाव अवघ्या 105 धावांवर आटोपला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला तब्बल 155 धावांची आघाडी मिळाली.


ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह ओकीफीने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या.

ओकीफीने एकाच षटकात तीन विकेट घेत, भारतीय फलंदाजीचं कंबरडं मोडलं. ओकीफीने 33 व्या षटकात आधी के एल राहुल, मग  अजिंक्य रहाणे आणि रिद्धीमान साहाला माघारी धाडून, भारताची अवस्था 6 बाद 95 अशी बिकट केली.

त्यानंतर मग नॅथन लायनने अश्विनला आणि ओकीफीने जयंत यादवला माघारी धाडून भारताची अवस्था आणखी वाईट म्हणजे 8 बाद 99 अशी केली. मग जाडेजा आणि उमेश यादव यांनाही ओकीफीनेच माघारी धाडत, भारताचा डाव अवघ्या 105 धावांत गुंडाळला.

आज सकाळी भारतानं ऑस्ट्रेलियाच्या अखेरच्या फलंदाजाला माघारी धाडून कांगारूंचा डाव 260 धावांत आटोपला होता. पण त्यानंतर फिल हेझलवूड, स्टीव्ह ओकीफी आणि मिचेल स्टार्कच्या वेगवान माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांची दाणादाण उडाली.

मुरली विजय (10) आणि चेतेश्वर पुजारा (6) स्वस्तात बाद झाले, तर विराट कोहलीला  भोपळाही फोडता आला नाही. लोकेश राहुलनं) झुंजार अर्धशतक ठोकून भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण राहुल 64 धावांवर बाद झाला. पाठोपाठ रहाणे (13) आणि अश्विनही (1)माघारी परतले.