नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. जवळपास 8 महिन्यानंतर 38 वर्षीय आशिष नेहराचं पुनरागमन झालं आहे. तर सुरेश रैना, युवराज सिंह आणि अमित मिश्रा यांच्या हाती पुन्हा एकदा निराशा लागली आहे.


''अखेरचा टी-20 सामना खेळल्यानंतर मी कुठे होतो हे कुणाला माहित नसेल. मात्र निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद आणि कर्णधार विराट कोहलीला ते चांगलं माहित होतं. दुखापतीतून सावरल्यानंतर फिटनेसवर काम केलं. पुनरागमनासाठी आवश्यक ती सर्व तयारी करत होतो'', असं नेहराने निवडीनंतर सांगितलं.

''टीकेची कधीही चिंता करत नाही. मी कुठे आहे हे भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुमला माहित असतं. हे निवड समितीलाही माहित असतं आणि कोहलीलाही. मी संघात आहे, तर निश्चितच काही तरी योगदान देत असेल'', असंही नेहरा म्हणाला.

''वयाचा जास्त विचार करत नाही. पुढच्या तीन सामन्यांसाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आशिष नेहरा चांगला खेळला तरी ती बातमी होते आणि नाही खेळला तरी ती बातमी होते'', असंही त्याने सांगितलं.

7 ऑक्टोबरपासून सुरु होत असलेल्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. गोलंदाज मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांना या मालिकेतून वगळण्यात आलं आहे. तर 38 वर्षीय आशिष नेहराला संधी देण्यात आली. नेहराने अखेरचा सामना फेब्रुवारी 2017 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. तर विकेटकीपर दिनेश कार्तिकलाही संधी देण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत सलग चार अर्धशतकं ठोकणाऱ्या अजिंक्य रहाणेलाही टी-20 संघात स्थान देण्यात आलेलं नाही. त्याच्याऐवजी शिखर धवनचा संघात समावेश करण्यात आला आहे. तर रवींद्र जाडेजाला पुन्हा एकदा संघातून बाहेर ठेवण्यात आलं आहे. सलामीवीर केएल राहुलला टी-20 संघात स्थान देण्यात आलं आहे.

टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंहला पुन्हा एकदा संघात स्थान देण्यात आलेलं नाही. शिवाय अनेक दिवसांपासून संघातून बाहेर असलेल्या सुरेश रैनाचीही यावेळी निराशा झाली आहे.

संबंधित बातमी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा