पोर्ट ऑफ स्पेन: वेस्टइंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून (शुक्रवार) सुरु होणाऱ्या या मालिकेत शिखर धवनसोबत अजिंक्य रहाणे सलामीला येणार आहे. वनडे मालिकेतील पाचही सामनात अजिंक्य रहाणेच सलामीला येईल असं विराट कोहलीनं जाहीर केलं.


चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित आणि शिखर धवन ही सलामीची जोडी होती. मात्र, या मालिकेत रोहितला विश्रांती देण्याचा निर्णय निवडी समिती घेतला. त्यामुळे आता रहाणेला संघात संधी मिळणार आहे.

जेव्हा सलामीच्या जोडीबद्दल कोहलीला विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला की, 'आमच्याकडे अजिंक्य आहे. जो चॅम्पियन्स ट्रॉफीपासून बॅकअप ओपनर आहे. तो नक्कीच या मालिकेत शिखर धवनच्या साथीनं सुरुवात करेल. डावाच्या सुरुवातीला त्यानं अनेकदा चांगलं प्रदर्शन केलं आहे.'

कोहली पुढे म्हणाला की, 'तो मधल्या फळीतही खेळला आहे. पण सलामीला त्याची फलंदाजी आणखी खुलून येते. त्यामुळेच या पाचही सामन्यात तो डावाची सुरुवात करेल.'