Abhishek Sharma: पोटाच्या संसर्गामुळे (stomach infection) टीम इंडियाचं ब्रह्मास्त्र अभिषेक शर्मा नामिबियाविरुद्धचा मागील सामना खेळू शकला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत संजू सॅमसनला संघात संधी मिळाली. तथापि, अभिषेकच्या प्रकृतीबाबत वरुण चक्रवर्तीने सकारात्मक माहिती दिली असून तो संघसहकाऱ्यांसोबत कोलंबोला रवाना झाला आहे. उद्या 15 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यासाठी तो भारतीय संघासोबत कोलंबोला पोहोचला आहे.
पाकिस्तानविरुद्ध खेळण्याची शक्यता
जर कोलंबोमधील सराव सत्रात अभिषेकला कोणतीही अडचण आली नाही, तर त्याला पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम अकरा (Playing XI) खेळाडूंमध्ये पुन्हा स्थान दिले जाण्याची दाट शक्यता आहे. शुक्रवारी रात्री दिल्लीहून निघालेल्या विमानाने तो कर्णधार सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि इतर खेळाडूंसह कोलंबोला पोहोचला. अभिषेक शर्मा सध्या त्याच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करत असून पाकिस्तानविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यात तो पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे.
दोन्ही संघ आठ वेळा एकमेकांशी भिडले
दुसरीकडे, क्रिकेट चाहते ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत तो क्षण आला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना अवघ्या काही तासात कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाईल. या महत्त्वाच्या सामन्यातील विजेता सुपर 8 मध्ये पात्र ठरेल, कारण दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने जिंकले आहेत आणि त्यांचे प्रत्येकी चार गुण आहेत. 2007 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या आवृत्तीपासून, दोन्ही संघ आठ वेळा एकमेकांशी भिडले आहेत, ज्यामध्ये भारताने सात सामने जिंकले आणि पाकिस्तानने एकच विजय मिळवला. यावेळी, टीम इंडिया ही संख्या 9-1 पर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवेल.
टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानला दणका
आजपर्यंत, टीम इंडियाने विराट आणि रोहितच्या ताकदीमुळे टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानला सातत्याने पराभूत केले आहे. तथापि, आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील मेन इन ब्लू नव्या उर्जेने मैदानात उतरत आहे. यावेळी, टीम इंडियाचे सात खेळाडू पहिल्यांदाच भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात सहभागी होत आहेत. ते विरोधी संघावर हल्ला करण्यास सज्ज आहेत.
2025 च्या आशिया कपमध्ये भारतीय संघाने सलग तीन सामन्यांमध्ये पाकिस्तानला हरवले. आता सलमान अली आघा यांच्या नेतृत्वाखालील तरुण पाकिस्तानी संघावर सात नवीन भारतीय खेळाडू आग ओकतील. हे असे सात खेळाडू आहेत जे पहिल्यांदाच ऐतिहासिक भारत-पाकिस्तान स्पर्धेचा भाग असतील. यापैकी अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंह, इशान किशन आणि कुलदीप यादव हे प्लेइंग 11 मध्ये खेळणे निश्चित मानले जाते.
इतर महत्वाच्या बातम्या