पणजी :  महाराष्ट्राचा ऑलिम्पिकपटू वीरधवल खाडे व त्याची पत्नी ऋजुता यांनी येथे अनुक्रमे पुरुष व महिला गटात वेगवान जलतरणपटूचा मान मिळवताना मुलखावेगळी कामगिरी केली. मिहीर आंम्ब्रेने ५० मीटर्स फ्री स्टाईल शर्यतीत कांस्यपदक जिंकताना आणखी एक पदकाची कमाई केली. महाराष्ट्राच्या पलक जोशीने आजारपणावर मात करीत २०० मीटर्स बॅकस्ट्रोक शर्यतीत सुवर्णपदक जिंकले तर ऋषभ दासने या शर्यतीत रौप्य पदक मिळवले. याचप्रमाणे तुषार गीतेने प्लॅटफॉर्म डायव्हिंगमध्ये कांस्यपदक जिंकले. महाराष्ट्राने मंगळवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमधील जलतरणात तीन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन रौप्य अशी एकूण सहा पदकांची कमाई केली. 

वीरधवलने ५० मीटर्स फ्रीस्टाईल शर्यत २२.८२ सेकंद अशा विक्रमी वेळेत पूर्ण करीत सुवर्णपदक जिंकले. त्याने २०१५ मध्ये स्वतःच नोंदवलेला २३ सेकंद हा स्पर्धा विक्रम येथे मोडला. त्याचा सहकारी मिहीरने याच शर्यतीत ब्रास पदक मिळवताना २२.९९ सेकंद अशी वेळ नोंदविली. वीरधवलच्या शर्यती पाठोपाठ त्याची पत्नी ऋजुताने ५० मीटर्स फ्रीस्टाईल शर्यत २२.४२ सेकंदांत पार केली आणि वेगवान जलतरणपटू हा किताब मिळवला. ही स्पर्धा जिंकताना तिने अवंतिका चव्हाणने राजकोट येथे गतवर्षी नोंदविलेला २६.५३ सेकंद हा स्पर्धा विक्रम मोडला. २०० मीटर्स बॅक स्ट्रोक शर्यतीत ऋषभ दास याने रौप्य पदक जिंकले. त्याने हे अंतर दोन मिनिटे ४.८० सेकंदात पार केले.

आजारपणावर मात करीत पलकची सोनेरी कामगिरीमहाराष्ट्राच्याच पलक जोशीने मिळवलेले यश अतिशय कौतुकास्पद आहे‌. तिने २०० मीटर्स बॅक स्ट्रोक शर्यत दोन मिनिटे २२.१२ सेकंदात पार करून सुवर्णपदक जिंकले. आज तिने प्राथमिक फेरीतून आठव्या क्रमांकाने अंतिम फेरी गाठली होती. मात्र जिद्दीच्या जोरावर तिने शेवटच्या १०० मीटर्समध्ये आघाडी घेत सोनेरी यश खेचून आणले. दोन दिवसांपूर्वी अन्नातून विषबाधा झाल्यामुळे तिच्यावर रुग्णालयात उपचार करावे लागले होते. आज सकाळी तिने पात्रता फेरीत भाग घेतला आणि आठवा क्रमांकासह अंतिम फेरीसाठी आपले स्थान निश्चित केले.

प्लॅटफॉर्म डायव्हिंगमध्ये तुषार गितेला कांस्यपदकमहाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तुषार गीतेने प्लॅटफॉर्म डायव्हिंगमध्ये कांस्यपदक जिंकून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शानदार सलामी दिली. या स्पर्धेमध्ये त्याचे हे पहिलेच पदक आहे. त्याने २४९.९० गुण नोंदवले. तो मुंबई येथील खेळाडू असून रेल्वे संघाकडून त्याने आजपर्यंत अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.

वॉटरपोलोच्या दोन्ही गटांत महाराष्ट्राचे धडाकेबाज विजयमहाराष्ट्राच्या संघांनी वॉटरपोलोमध्ये पुरुष व महिला या दोन्ही गटांत एकतर्फी विजय नोंदवत आगेकूच कायम राखली. पुरुषांच्या गटात महाराष्ट्राने मणिपूरचा २८-३ असा धुव्वा उडवला. महाराष्ट्राचा हा पहिला सामना होता. महिलांच्या गटात महाराष्ट्राने आसाम संघाचा २५-१ असा दारुण पराभव केला. महाराष्ट्राचा हा सलग दुसरा विजय आहे. काल त्यांनी मणिपूर संघाची धूळधाण उडवली होती.