मुंबई : 2007चा विश्वचषक हा भारतीय संघासाठी अत्यंत वाईट काळ होता. असं मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं व्यक्त केलं आहे. 2007च्या विश्वचषकात पहिल्याच फेरीत बाहेर पडल्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये अनेक सकारात्मक बदल पाहायला मिळाले. असंही सचिन म्हणाला. तो एका कार्यक्रमात बोलत होता.


यावेळी बोलताना सचिन म्हणाला की, 'मला वाटतं की, 2006-07 हा काळ संघासाठी फारच वाईट होता. आम्ही विश्वचषकातील सुपर 8 फेरीतही प्रवेश करु शकलो नाही. पण तिथूनच आमचा खरा प्रवास सुरु झाला. नव्या पद्धतीनं विचार करणं आम्ही सुरु केलं आणि त्या दिशेनं विचार करु लागलो.'

राहुल द्रविडच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ त्यावेळी श्रीलंका आणि बांगलादेशकडून पराभूत होऊन पहिल्याच फेरीत बाद झाला होता.

'या विश्वचषकानंतर आम्हाला बरेच बदल करावे लागले. त्यानंतर आम्ही जोमानं कामाला लागलो आणि त्याचे चांगले परिणामही आम्हाला दिसू लागले.' असंही तेंडुलकर म्हणाला.

'आम्हाला अनेक बदल करावे लागले. तेव्हा हे बदल योग्य आहेत की अयोग्य हे आम्हाला माहित नव्हतं. त्यासाठी आम्हाला बरीच वाट पाहावी लागली. विश्वचषकाची ट्रॉफी उचलण्यासाठी मला 21 वर्ष वाट पाहावी लागली.' असंही सचिन यावेळी म्हणाला.

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात 2011 साली भारतानं विश्वचषक पटकावला. यावेळी भारतीय संघात तेंडुलकरची भूमिका महत्त्वाची होती.