शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर कोण काय बोललं?
तर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी युतीचा पोपट आधीच मेला होता, फक्त त्याची आज घोषणा केल्याचा टोला लगावला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना 25 वर्षापासूनची भाजप सोबतची युती तुटल्याचं जाहीर केलं. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना युती तुटल्याबद्दल दु: ख होत आहे असं म्हणलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे येतील त्यांच्यासोबत आणि जे येणार नाहीत, त्यांच्या शिवाय परिवर्तन करु असं ट्वीट केलं आहे.
मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनीही ट्वीट करुन मुंबई महापालिका निवडणूक आणि भाजपाची भूमिका या विषयी मी 28 ला गोरेगाव येथे होणाऱ्या विजय संकल्प मेळाव्यात बोलेन, असं सांगितलं आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी, गुळाला मुंगळा जसा चिकटतो, तशी शिवसेना अजूनही सत्तेला चिटकून आहे. निवडणुकीसाठी युती तोडली खरी, पण सत्तेतून बाहेर पडण्याची सेनेत धमक नाही, असा खोचक टोला लगावला आहे.