राज ठाकरेंच्या विक्रोळीतील सभेतील महत्वाचे मुद्दे
जिथे लोकांनी संधी दिली, तिथे स्वतःला सिद्ध करुन दाखवलं. पाचपैकी दोन वर्ष सरकारने नाशिकला आयुक्त दिले नाही. तरीही व्यवस्थितपणे कारभार केला. चांगले रस्ते, चांगल्या योजना द्यायच्या असतील, तर देता येतात, असं म्हणत राज ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर हल्ला चढवला.
नाशिकचे रस्ते, बोटॅनिकल गार्डन एकदा पाहा. बोटॅनिकल गार्डन तयार करण्यासाठी फक्त 3 कोटी रुपये खर्च आला. पण ते गार्डन पाहून रतन टाटांनीही पाठ थोपटली, असंही राज ठाकरे म्हणाले.
मुंबईत आज खेळायला मैदान नाही. पण यांनी स्वतःच्या नावाने क्लब उभे केलेत. त्यातून ते बक्कळ पैसा कमावत आहेत. मग मुंबईकरांच्या हाताला काय लागलं, असा सवाल राज ठाकरेंनी शिवसेना-भाजपला केला.
शिवाय शिवसेनेकडून बाळासाहेबांच्या नावाखाली भ्रष्टाचार दडवण्याचं काम केलं जात असल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केला. बाळासाहेबांच्या नावाखाली महापौर बंगल्यावर डोळा असल्याची टीकाही त्यांनी केली.
मुंबईत शिवसेनेने भ्रष्टाचार केला असेल. पण भाजपही त्यांच्यासोबत सत्तेत आहे. शिवसेनेवर टीका करण्याचा भाजपला अधिकार नाही. भाजपच्या खिशात काही तरी गेलचं असेल ना, असा सवाल राज ठाकरेंनी केला.
मुंबईत 100 कोटी रुपये दरवर्षी फक्त खड्डे बुजवायला दिले जातात. खड्डे बुजवायला एवढे पैसे देणारी मुंबई देशातील एकमेव महापालिका आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
सरकारकडे पैसा नाही, पण लोकांना आकर्षित करण्यासाठी केवळ जाहिरातबाजी सुरु आहे, अशी टीका राज ठाकरेंनी केली. तर मुंबई महापालिकेत केवळ आकडे दाखवले जातात, पण पैसा जातो कुठं ते कुणाच्याही लक्षात येत नाही, असा आरोप त्यांनी केला.
महापालिकांच्या प्रचारात उशीरा एंट्री घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवसेना आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे. मुंबई महापालिकेतील कारभारावरुन त्यांनी शिवसेनेला जोरदार लक्ष्य केलं.
पाच राज्यात निवडुका चालू आहेत. सगळीकडे कोट्यावधींचा व्यवहार रोखीने होतोय. कॅशलेस भारत कुठे गेला?, नोटाबंदीने काही दिलं तर नाहीच, शिवाय अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. एटीएमच्या रांगेत निष्पाप लोकांचे जीव गेले, असं राज ठाकरे म्हणाले.
भाजपकडे सध्या बक्कळ पैसा पैसा आहे. तो पैसा कुठून आला. पार्टी विथ डिफरन्स म्हणजे आमच्याकडे आहे, तुमच्याकडे नाही, असा अर्थ होतो, असा घणाघात राज ठाकरेंनी केला.
सगळीकडे प्रचाराची धामधूम चालू आहे. मात्र मनसेच्या प्रचाराला उशीर झाला. कारण मुलगा अमित हॉस्पिटलमध्ये होता. त्यामुळे बाहेर पडता आलं नाही, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.
पंतप्रधान मोदींनी 8 नोव्हेंबरला नोटाबंदी केल्यानंतर 50 दिवसानंतर नवा भारत दिसेल असं सांगितलं होतं. मात्र तीन महिने झाले, पण काही बदलल्याचं दिसतंय का, असा सवालही राज ठाकरेंनी केला. नोटाबंदीच्या मुद्द्यावरुन त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.