पंतप्रधान मोदींच्या भाषणातील दहा महत्त्वाचे मुद्दे
नोटाबंदी, जीएसटी आणि पेट्रोल-डिझेलचे वाढते दर यामुळे सरकारला जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे आजच्या भाषणातून मोदींनी या सर्व टीकांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मोदी सरकारच्या आर्थिक निर्णयांवर देशभरातून सध्या टीका सुरु आहे.
‘देशाच्या विकासासाठी आम्ही आणखी मोठे निर्णय घेणार आहोत. माझ्या वर्तमानकाळासाठी मी देशाचं भविष्याची मी आहुती देऊ शकत नाही.’ असंही मोदी यावेळी म्हणाले.
देशात कार, कमर्शिअल गाड्या खरेदी, विमानप्रवास यांच्यामध्ये प्रचंड वाढ झाल्याचं सांगत मोदींनी देशातील जनतेचं राहणीमान उंचावल्याचं यावेळी सांगितलं.
जीएसटीबाबत बोलताना मोदींनी स्पष्ट केलं की, ‘GSTच्या काही नियमाचा व्यापाऱ्यांना फटका बसत आहे. पण लवकरच या नियमांमध्ये बदल केले जातील.’
‘मी अर्थतज्ज्ञ असल्याचा दावा कधीच केला नव्हता. सर्व ज्ञान आम्हालाच आहे असा दावाही आम्ही कधीच करत नाही.’ असं म्हणत मोदींनी टीकाकारांना उत्तर दिलं.
यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, ‘काँग्रेसच्या काळात विकासदर तब्बल 5 वेळा घसरला होता. मात्र, आता देशात परदेशी गुंतवणूक वाढली आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था भक्कमपणे उभी आहे.’
8 नोव्हेंबर 2016 हा भ्रष्टाचार मुक्ती दिन असल्याचं सांगत मोदींनी सुरुवातीलाच नोटाबंदीचंही समर्थन केलं आहे.
अर्थव्यवस्थेशी निगडीत प्रत्येक मुद्द्याबाबत मोदींनी आकडेवारी सादर करत उत्तर दिलं. दरम्यान, यावेळी पंतप्रधान मोदींनी मागील यूपीए सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला.
‘देशाच्या विकासासाठी आणखी मोठे निर्णय घेणार, आज देशात मंदीचा लवलेशही नाही. संकुचित मनाच्या लोकांना विकास दिसत नाही.’ असं म्हणत पंतप्रधान मोदींनी टीकाकारांना उत्तर दिलं आहे. दिल्लीतील विज्ञान भवनमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते.