ओखी वादळाचं सावट कायम, कोकण किनाऱ्यावर समुद्राला उधाण
ओखी वादळाचा फटका आता गोव्यामध्ये बसू लागला आहे. कारण खवळलेल्या समुद्रात बुडताना दोन महिला पर्यटकांना वाचवण्यात आलं आहे. दक्षिण गोव्यातल्या प्रसिद्ध पाळोळे बीचवर दोन आयरिश महिला समुद्रात उतरल्या होत्या. पण वादळी वाऱ्यांमुळे समुद्र खवळला आणि समुद्राचं पाणी किनाऱ्याला ओलांडून पुढे आलं.
पावसाळ्यात जितकं पाणी चढतं तेवढं पाणी किनाऱ्याच्या भागात चढलं आहे. त्याचबरोबर लाटांचं प्रमाणही वाढलंय. त्यामुळे किनारपट्टीवरच्या भागातील गावांना अतिसतर्कतेचा इशारा दिला आहे. तर काही ठिकाणी स्थानिकांनी रस्त्यांवर गर्दीही केल्याचं पाहायला मिळतंय.
रत्नागिरीतही अनेक किनारपट्टीच्या भागात समुद्राचं पाणी किनाऱ्याच्या भागात घुसलं आहे.
किनाऱ्यावरील मच्छीमार बांधव आणि स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तर मालवण तालुक्यातील आचरा, मेढा, दांडी, किनारपट्टीलाही समुद्राच्या उधाणाचा तडाखा बसलाय. पिरावाडी गावाशी संपर्क तुटलाय तर देवबागमध्ये कुर्लेवाडीत पाणी घुसलंय.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ओखी वादळाचा परिणाम पाहायला मिळत आहे. मालवण, वेंगुर्ले, देवगड समुद्र किनाऱ्यावर तडाखा बसला आहे. कोचरा-देवबागला समुद्राचं पाणी वस्तीत घुसलं.
खासकरुन 4 आणि 5 डिसेंबरला मुंबई लगतच्या अरबी समुद्राला ओखी वादळाच्या धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई आणि कोकणात मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलाय.
कोकण किनारपट्टीतल्या सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. भारतीय हवामान खात्याकडून मिळालेल्या सुचनेनुसार, आजपासून 6 तारखेपर्यंत काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
केरळ आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धुमाकूळ घालणाऱ्या ओखी चक्रीवादळाचा परिणाम कोकण आणि महाराष्ट्राच्या किनारपट्ट्यांवर जाणवू लागला आहे. मुंबईसह कोकणातल्या समुद्रांनी काल रात्री रौद्ररुप धारण केलं.