आयपीएल 10चे 'हिरो' तरीही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात स्थान नाही!
दिल्ली डेअरडेव्हिलसचा धडाकेबाज फलंदाज ऋषभ पंतला भारतीय संघात स्थान दिलं जावं अशी अनेकांची मागणी होती. पण त्यालाही संघात स्थान मिळू शकलेलं नाही. ऋषभनं आयपीएल 10मध्ये 11 सामन्यात 281 धावा केल्या आहेत. गुजरात लायन्सविरुद्ध त्यानं अवघ्या 43 चेंडूत 97 धावांची तुफानी फलंदाजी केली होती. निवड समितीनं ज्या 5 खेळाडूंना स्टॅण्डबायसाठी ठेवलं आहे त्यात ऋषभ पंतचंही नाव आहे.
भारताचा दिग्गज गोलंदाज आशिष नेहराची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात निवड होणार हे जवळपास निश्चित होतं. पण आयपीएलमध्ये खेळताना त्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याची निवड होऊ शकली नाही. दुखापतग्रस्त होण्याआधी नेहरानं आयपीएलमध्ये 6 सामन्यात 8 बळी घेतले होते.
गुजरात लायन्सचा कर्णधा सुरेश रैना याला संघात स्थान मिळणारच असं अनेकांना ठामपणे वाटत होतं. पण तसं होऊ शकलं नाही. रैनानं आयपीएलच्या 10 व्या मौसमात 12 सामन्यांमध्ये 48 पेक्षा अधिकच्या सरासरीनं 434 धावा केल्या आहेत. पण रैनाला स्टॅण्डबाय ठेवण्यात आलं आहे.
केकेआर संघाचा कर्णधार गौतम गंभीरबाबत बरीच चर्चा सुरु होती. त्याला संघात स्थान मिळेल असं अनेकांना वाटत होतं. पण त्याला संघात घेण्यात आलेलं नाही. गंभीरनं यंदाच्या आयपीएलमध्ये 12 सामन्यात 47च्या सरासरीनं 425 धावा केल्या आहेत. यामध्ये त्यानं 4 अर्धशतकं झळकावली आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपल्याला संघात नक्कीच स्थान मिळेल अशी आशा भारताचा फिरकीपटू हरभजन सिंहला होती. पण त्याला पहिल्या 15 मध्ये स्थान मिळू शकलेलं नाही. हरभजननं यंदाच्या आयपीएलमध्ये 10 सामने खेळले असून त्याने 8 विकेट घेतल्या आहेत. या दरम्यान त्याचा इकोनॉमी रेट 5.81 आहे.
इंग्लंड आणि वेल्समध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताच्या 15 खेळाडूंची घोषणा झाली आहे. पण यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करुनही काही खेळाडूंना संघात स्थान मिळू शकलेलं नाही.