सर्जिकल स्ट्राईक: असा घेतला उरीचा हल्ल्याचा बदला!
भारतीय जवानांनी LOC पार करुन सुमारे दोन किमी आत घुसून अतिरेक्यांचा खात्मा केला. मध्यरात्री 12.30 ते पहाटे 4.30 पर्यंत ही कारवाई करण्यात आली. यावेळी भारतीय जवानांनी एक-दोन नव्हे तर 5 तळं उद्ध्वस्त केली. इतकंच नाही तर हा हल्ला करुन, जवान गुपचूप भारतात परतले. हॉटस्प्रिंग, लिपा, केल, भिंबर या अतिरेकी तळांवर भारतीय जवानांनी हल्ला करुन, उरी हल्ल्याचा बदला घेतला.
जवानांनी आधी हेलिकॉप्टरने अतिरेक्यांच्या तळाकडे कूच केली. मग हेलिकॉप्टरमधून उतरून, जवानांनी चालत जाऊन अतिरेकी तळांना घेरलं आणि हल्लाबोल केला.
बुधवारी रात्री 12.30 च्या सुमारास भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरकडे मोर्चा वळवला.
कालच दहशतवादी एलओसी पार करुन भारतात घुसण्याच्या तयारीत होते. मात्र त्याची कुणकुण भारताला लागली. भारतीय जवानांनी थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून अतिरेक्यांचा खात्मा केला.
सर्जिकल स्ट्राईक म्हणजेच अतिशय नेमकेपणाने केलेली लष्करी कारवाई असते. सोप्या भाषेत शत्रूची ठिकाण पाहून, तिथे घुसून मारणं होय.
उरी हल्ल्यानंतर आक्रमक झालेल्या भारताने थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून हल्ला चढवला आहे. भारतीय जवानांनी दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करुन, 38 ते40 अतिरेक्यांचा खात्मा केला. भारताच्या सर्जिकल स्ट्राईक्सची माहिती आज डीजीएमओ रणबीर सिंह यांनी दिली.