यवतमाळ : राजकारणासाठी लोक काय करतील त्याचा अंदाज बांधण देखील कठीण आहे, राजकारणात लोक क्रौर्याची परिसीमा देखील पार करताना दिसत आहेत. अशातच परंपरागत राजकीय वैमनस्यातून वचपा काढण्यासाठी चक्क विरोधकाच्या घराभोवती तारा बांधून त्यात वीज प्रवाह सोडण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेमध्ये 37 वर्षीय महिलेचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला आहे, तर तिचा पती थोडक्यात बचावला. ही घटना आर्णी तालुक्यातील अंजीनाईक येथे काल (शनिवारी) पहाटेच्या सुमारास घडली आहे. सविता मनेश पवार (37 वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे 2.30 वाजता सविता उठली. घराबाहेर पडल्यानंतर चप्पल घालत असतानाच अचानक जागेवर खाली पडली. काहीतरी पडल्याचा आवाज आल्यानंतर पती मनेश बाहेर आला. त्यानंतर त्यालाही विजेचा जोरदार झटका लागला. त्यावेळी त्या आरडाओरडा केला तेव्हा शेजाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. पती, पत्नी या दोघांनाही आर्णी रुग्णालयात तातडीने उपचारांसाठी हलवण्यात आले आहे. तेथे डॉक्टरांनी सविताच्या उजव्या हाताला वीज तारेचा स्पर्श होऊन मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली. या घटनेनं संताप देखील व्यक्त केला जात आहे. मनेश देवराव पवार याच्या तक्रारीवरून घाटंजी पोलिसांनी इंदल राठोड (47), सुदाम चव्हाण (65), गणेश राठोड (59), विनोद रामकृष्ण चव्हाण (48), राजू कवडू जाधव (35), चेतन निवृत्ती चव्हाण (28) या सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.
राजकीय वैमनस्यातून वचपा काढण्यासाठी केलं कृत्य
परंपरागत राजकीय वैमनस्यातून वचपा काढण्यासाठी चक्क मनेश पवार यांच्या विरोधकांनी त्यांच्या घराभोवती तारा बांधून त्यात वीज प्रवाह सोडला. वीज प्रवाह सोडल्यानंतर पहाटेच्या सुमारास 2.30 वाजता मनेश पवार यांची पत्नी सविता उठली. चप्पल घालत असतानाच अचानक जागेवर खाली पडली. काहीतरी पडल्याचा आवाज आल्यानंतर पती मनेश बाहेर आला. त्यानंतर त्यालाही विजेचा जोरदार झटका लागला. त्यावेळी त्या आरडाओरडा केला तेव्हा शेजाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. पती, पत्नी या दोघांनाही आर्णी रुग्णालयात तातडीने उपचारांसाठी हलवण्यात आले आहे. तेथे डॉक्टरांनी सविताच्या उजव्या हाताला वीज तारेचा स्पर्श होऊन मृत्यू झाल्याचे सांगितले.
घटनास्थळी तणावाचं वातावरण
या संतापजनक घटनेनंतर परिसरात काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पांढरकवडा एसडीपीओ आणि घाटंजी ठाणेदार केशव ठाकरे शनिवारी सकाळपासूनच गावात तळ ठोकून होते. परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सविताच्या मृतदेहाची यवतमाळ येथे वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सायंकाळी तिच्या पार्थिवावर अंजी नाईक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.