Pakistan News : पाकिस्तानचं शेपूट वाकडंच! कुख्यात दहशतवादी मसूद अझहरला 14 कोटींची नुकसान भरपाई देण्याचा प्लॅन; काय आहे प्रकरण?
Pakistan News : पाकिस्तान भारताच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या दहशतवाद्यांच्या नेटवर्कला पुन्हा उभं करण्याच्या प्रयत्नात आहे. पाक सरकारने दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांसाठी नुकसानभरपाई जाहीर केली आहे.

Pakistan News : 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) दरम्यान भारताने पाकिस्तानला (India vs Pakistan) चोख प्रत्युत्तर देत नऊ दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केले आणि ही सर्व ठिकाणे पूर्णपणे उद्ध्वस्त केली. भारताच्या या हल्ल्यात कुख्यात दहशतवादी मसूद अझहरच्या (Masood Azhar) कुटुंबातील 14 जण ठार झाल्याची माहिती आहे.
मसूद अझहर हा जैश-ए-मोहम्मद (JeM) या दहशतवादी संघटनेचा संस्थापक आहे. मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत त्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारताच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या दहशतवादी नेटवर्कला पुन्हा उभं करण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत आहे. पाकिस्तान सरकार मसूद अझहरला देखील 14 कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याची शक्यता आहे.
पाक सरकारकडून नुकसानभरपाई पॅकेजला मंजुरी
भारताच्या हवाई हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना (कायदेशीर वारसदार म्हणून) 1 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाई पॅकेजला पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी मंजुरी दिल्याची माहिती समोर येत आहे. आता जर मसूद अझहर हा आपल्या कुटुंबातील मृत 14 जणांचा एकमेव कायदेशीर वारसदार असेल, तर त्याला एकूण 14 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे.
भारताच्या हल्ल्यात JeM चे मुख्यालय उद्ध्वस्त
भारतीय लष्कराने 07 मे रोजी लाहोरपासून सुमारे 400 किलोमीटर अंतरावर असलेल्या बहावलपूर येथील एका दहशतवादी छावणीवर निशाणा साधून हल्ला केला, जे जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय होते. पाकिस्तानी माध्यमांनी मसूद अझहरच्या हवाल्याने दिलेल्या निवेदनात सांगितले आहे की, हल्ल्यात ठार झालेल्यांमध्ये त्याची मोठी बहीण, मेहुणा, एक भाचा आणि त्याची पत्नी यांचा समावेश आहे. दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई देण्याचा आणि दहशतवाद्यांचे तळ पुन्हा उभे करण्याचा पाकिस्तानचा हा प्रयत्न भारतासह जगातील अनेक देशांसाठी धक्कादायक असून, त्यामुळे सुरक्षेबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाकिस्तानकडे एवढे पैसे कुठून येणार?
आर्थिक कोंडीत सापडलेल्या पाकिस्तानकडे एवढे पैसे येणार कुठून? आता सवाल उपस्थित होत आहे. पाकिस्तान सरकारकडे हे पैसे सामान्य नागरिकांकडून गोळा केलेल्या करांच्या माध्यमातून उभे केले जातील. याशिवाय, 7 अब्ज डॉलर्सच्या एक्सटेंडेड फंड स्कीम (EFF) अंतर्गत पाकिस्तानला आत्तापर्यंत IMF कडून एकूण 2.1 अब्ज डॉलर्स मिळाले आहेत. यासोबतच, क्लायमेट रेजिलिएन्स लोन प्रोग्रॅम अंतर्गत पाकिस्तानला 1.4 बिलियन डॉलर्स (सुमारे 12 हजार कोटी रुपये) चे नवीन कर्जही मंजूर झाले आहे. पाकिस्तान हे पैसे खरंच आपल्या देशातील जनतेसाठी आणि कोसळणाऱ्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी वापरणार की हे पैसे दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी खर्च केले जाणार आहेत? याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’चा नवा व्हिडीओ भारतीय लष्कराकडून जारी
दरम्यान, भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’शी संबंधित आणखी एक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये लष्कराचे जवान दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करत ते पूर्णपणे उद्ध्वस्त करताना दिसत आहेत. इंडियन आर्मीने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे – “प्लॅनिंग केली, ट्रेनिंग घेतली आणि कारवाई केली. न्याय झाला.”
#WATCH | Western Command - Indian Army posts a video of Operation Sindoor on its social media handle 'X'.
— ANI (@ANI) May 18, 2025
"Planned, trained & executed. Justice served"- Indian Army pic.twitter.com/Z3SwvGS1j3
भारतीय सैन्याने आपल्या व्हिडीओमध्ये सांगितले, “याची सुरुवात पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून झाली. राग नव्हता, ते ज्वालामुखी होते. मनात एकच विचार होता की, यावेळी असा धडा शिकवू की त्यांच्या पिढ्यांना लक्षात राहील. हा बदला नव्हता, हा न्याय होता. 9 मे रोजी रात्री सुमारे 9 वाजता ज्या कोणत्याही शत्रूच्या पोस्टने सीजफायरचे उल्लंघन केले, त्या सर्व पोस्ट भारतीय लष्कराने जमीनदोस्त केल्या. ऑपरेशन सिंदूर ही केवळ एक कारवाई नव्हती, तर पाकिस्तानसाठी तो धडा होता, जो त्याने शिकलेला नव्हता,” असे म्हटले आहे.
आणखी वाचा























