तज्ज्ञांचे म्हणणे आहे की असीम मुनीर यांना अमेरिकेचा पाठिंबा मिळाला आहे आणि मागील लष्करप्रमुखांप्रमाणे तेही सत्तापालट करून आसिफ अली झरदारी यांना पदावरून हटवू शकतात आणि स्वतः राष्ट्रपती बनू शकतात. पाकिस्तानातून येणाऱ्या अशा बातम्यांबाबत अधिक माहिती जाणून घेऊया की, याआधी पाकिस्तानमध्ये कधी सत्तापालट झाले आणि कोणत्या लष्करप्रमुखांनी लोकशाही अक्षरक्ष: पायाखाली तुडवली.
सत्तापालट म्हणजे नेमकं काय?
सर्वप्रथम, हे जाणून घेऊया की, सत्तापालटाचा इतिहास नवीन नाही. हा शब्द पहिल्यांदा 19व्या शतकात वापरला गेला, जेव्हा अनेक देशांमध्ये सत्तापालटाच्या घटना पाहायला मिळाल्या. सत्तापालट दोन प्रकारे होतो, एक म्हणजे लष्करी सत्तापालट आणि दुसरा म्हणजे राजकीय सत्तापालट. जेव्हा लष्कर स्वतःच्या सरकारविरुद्ध बंड करते आणि देशाचा ताबा घेते तेव्हा त्याला लष्करी उठाव म्हणतात, तर जेव्हा राजकीय कट रचून निवडून आलेले सरकार उलथवले जाते तेव्हा त्याला राजकीय उठाव म्हणतात.
पाकिस्तानला सत्तापालटांचा मोठा इतिहास
भारतापासून वेगळे झाल्यानंतर, पाकिस्तान अनेक वेळा राजकीय अस्थिरतेचा बळी ठरला आहे आणि अनेक वेळा लष्कराने निवडून आलेले सरकार उलथवून स्वतःच्या हातात सत्ता घेतली आहे. 1953-54 मध्ये गव्हर्नर जनरल गुलाम मोहम्मद यांनी पंतप्रधान ख्वाजा नजीमुद्दीन यांचे सरकार बरखास्त केले तेव्हा येथे सत्तापालटाची पहिली घटना घडली. यानंतर,1958 मध्येही असेच घडले, जेव्हा राष्ट्रपती मेजर जनरल इस्कंदर अली मिर्झा यांनी संविधान सभा आणि फिरोज खान नून यांचे सरकार बरखास्त केले. त्यानंतर,1977 मध्ये, लष्करप्रमुख झियाउल हक यांनी तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांचे सरकार उलथवून टाकले. तर 1999 मध्ये लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी नवाझ शरीफ यांचे सरकार उलथवून पाकिस्तानात सत्तापालट केला होता.
हे ही वाचा