नवी दिल्ली : मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईद बुरहान वानीच्या संपर्कात असल्याचे आता समोर येत आहे. हाफिजनेच याबाबतचा खुलासा पाकिस्तानमधील गुजरांवालामध्ये केला आहे. बुरहानने भारतीय फौजांशी लढण्यासंदर्भात रणनिती बनवताना आपल्याला विचारले असल्याची कबुली हाफिजने आज दिली.


 

हाफिजने यासंदर्भातील स्पष्टीकरण देताच भारतीय सुरक्षा ऐजंन्सींनीही बुरहानचे कॉल रेकॉर्ड तपासले असता याची पुष्टी मिळाली आहे.

 

हाफिज सईद आणि सैय्यद सलाउद्दीन काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढवण्यासाठी हवालाच्या माध्यमातून 50 ते 60 कोटी रुपये पाठवले होते. यासाठी पाकव्याप्त काश्मीरमध्येही आयएसआयचे अधिकारी, हाफिज सईद आणि सलाउद्दीन यांच्यात अनेक बैठका झाल्या होत्या. या बैठकीवेळी जैशचा कमांडर अब्दुर रऊफही उपस्थित होता. विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरात शंभर कोटी रुपये हवालाच्या माध्यमातून काश्मीरमध्ये पाठवण्यात आल्याचे वृत्त आहे.

 

बुरहान वानीच्या हत्येनंतर काश्मीर खोऱ्यात अशांतता पसरवण्यासाठी ४ कमांडर बनवण्यात आले होते. काश्मीर खोऱ्यातील अशंतता अधिकच वाढवण्यासाठी हाफिज आणि सलाउद्दीन पाकिस्तानमधील कंट्रोल रूममध्ये बसून या कमांडरना मार्गदर्शन करत असल्याचेही आता समोर येत आहे.