Wardha Accident News :वर्धा जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. पुलगाव-आर्वी रोडवर विरुळ जवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या धडकेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. एक दुचाकी पुलगावच्या दिशेने तर एक दुचाकी विरुळच्या दिशेने जात होती. यावेळी दोन्ही दुचाकींची समोरासमोर धक होऊन हा अपघात झाला. एकाच वेळी तिघांचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे.  

Continues below advertisement

दरम्यान दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक होऊन हा अपघात घडला आहे. यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पुलगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह रुग्णालयात पाठवले आहेत. याप्रकरणी पुलगाव पोलिसांनी नोंद केली आहे. 

लातूर शहरातील गांधी चौक दुचाकीस्वारचा अपघात

लातूर शहरातील गांधी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गावरील मिनी मार्केट परिसरात वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याने कारवाईसाठी एका दुचाकीस्वाराला थांबवण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. मात्र चालत्या दुचाकीसमोर अचानक येऊन वाहन अडवण्याचा प्रयत्न केल्याने दुचाकीस्वार गडबडला. तात्काळ ब्रेक लावण्याच्या नादात गाडी डिव्हायडरला धडकली. या अपघातात किरकोळ जखमी झालेला दुचाकी स्वार थोडक्यात बचावला आहे. या घटनेचा व्हिडिओ पाठीमागून येणाऱ्या कारच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. वाहतूक नियमांची अंमलबजावणी करताना पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहनचालकांच्या सुरक्षिततेचाही विचार करणे आवश्यक असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या घटनेनंतर लातूर पोलीस दलातील वाहतूक शाखेबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेतील दोषी पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई होणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Continues below advertisement

मिरज शहरातील मंगळवार पेठ येथील बॉम्बे स्टार बेकरीसमोर आज सकाळी  एक धक्कादायक अपघात घडला. टर्न घेत असताना चारचाकी वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने वाहनाने प्रथम एका दुचाकीला धडक दिली आणि त्यानंतर थेट एका घरात घुसली. मंगळवार पेठ परिसरातील बॉम्बे स्टार बेकरीसमोर हा अपघात घडला. चारचाकी वाहन वळण घेत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन भरधाव वेगाने पुढे गेले. यावेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला धडक देत वाहन थेट घरात घुसले. या घटनेत घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घरमालक इम्तियाज सौदागर यांच्या मालमत्तेची हानी झाली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला.