ठाणे : मनसेचे ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या मनसे दहीहंडीचा उत्साह मोठ्या उत्साहात सुरू आहे. यंदा 'मराठी सणांसाठी, मराठी मनांसाठी' असे ब्रीदवाक्य घेऊन या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्व ठिकाणी 'म... मराठीचा' असे बॅनर लावले आहेत. मनसेच्या या दहीहंडीत आमदार जितेंद्र आव्हाड आले. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या एका कृतीची जोरदार चर्चा सुरू आहे.

ठाण्यामध्ये मनसेचे नेत अविनाश जाधव यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित राहिले. त्यावेळी त्यांनी उपस्थितांना मराठी माणसाची ताकद दाखवा असं म्हणत 'जय जय महाराष्ट्र' गीत गायलं.

जय जय महाराष्ट्र लाव रे, आव्हाडांचा डीजेला आदेश

जितेंद्र आव्हाड हे स्टेजवर येतात मनसेच्या अविनाश पानसे यांनी त्यांचे आभार मानले. आनंद दिघे यांनी पहिल्यांदा या सणाला मोठं स्वरुप दिलं. त्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी हा सण मोठा केला. आव्हाडांनी दहीहंडी सण जगभरात पोहोचवला. स्पेनची टीम मुंबईत आणली अशा शब्दात पानसे यांनी आव्हाडांचे कौतुक केले.

जितेंद्र आव्हाडांच्या हातात माईक येतात त्यांनी डीजेला जय जय महाराष्ट्र हे राज्यगीत लावण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना महाराष्ट्र गीतावर हात वरती करण्याचं आवाहन केलंसगळ्यांचे हात वरती पाहिजेत. हे आपल्या महाराष्ट्राचं गीत आहे, मराठी माणसाचे गीत आहे. एकही हात खाली असता कामा नये, मराठी माणसाची ताकद दाखवा असं आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केलं. त्याचवेळी आव्हाडांनी स्वतः महाराष्ट्र गीत गायलं. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय! अशा घोषणाही जितेंद्र आव्हाडांनी केली.

जुने दिवस आठवले, आव्हाडांची प्रतिक्रिया

यानंतर माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "जुने दिवस आठवले, पक्ष जात धर्म विसरून येथे गोविंदा पथक येत असतात. आम्ही त्यांच्यासाठी इथे येत असतो. आज अविनाशने बोलावलं, मी आलो. इथे आल्यावर राज्यगीत, जे मी माझा कार्यक्रमात घ्यायचो ते घेतलं. आज थोडं फ्लॅशबॅक गेलो."

आव्हाड याच्या गोविंदात कायम पायरीवर उभे राहून गोविंदाचा कार्यक्रम बघायचो. या कार्यक्रमाला ग्लोबल स्वरूप कोणी दिलं तर आव्हाड साहेबांनी. ठाणे ही दहिहंडी उत्सवाची पंढरी आहे आणि या पंढरीचा विठ्ठल हा जितेंद्र आव्हाड आहे अशी प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी दिली.

जय जवानचा 10 थरांचा विक्रम

मुंबईतील घाटकोपरमध्ये मनसेचे गणेश चुक्कल आणि अरविंद गिते मित्र परिवार आयोजित दहीहंडी उत्सवामध्ये, जय जवान गोविंदा पथकानं 10 थरांची दहीहंडी रचत सर्वांना थक्क केलं. याआधी कोकण नगर गोविंदा पथकाने ठाण्यातील प्रताप सरनाईक यांच्या संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीत 10 थरांचा विश्वविक्रम रचला होता. त्या विक्रमानं जय जवान पथकाला मागे टाकलं होतं खरं, पण अगदी काही तासांतच घाटकोपरमध्ये जय जवान पथकानं तोच विक्रम गाठत पुन्हा आपलं वर्चस्व सिद्ध केलं. 'गोविंदा पथकांचे खरे राजे आम्हीच', असा दमदार संदेश जय जवान पथकानं या थरारक कामगिरीतून दिला.

ही बातमी वाचा: