MNS Traffic March : ठाण्यातील प्रचंड वाहतूक कोंडी, जड अवजड वाहनांची बेकायदेशीर वाहतूक, आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या 20 सप्टेंबर रोजी मनसेकडून (MNS) ठाणे महापालिकेसमोर ट्राफिक मार्च मोर्चा (Traffic March Morcha) काढण्यात येणार असून, हा मोर्चा मनसे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.
काल सोमवारी (दि. 15) झालेल्या प्रशासनाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोडबंदर रस्त्यावर रात्री बारा वाजेनंतरच जड वाहने सोडण्याचे आदेश सर्व यंत्रणांना दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसेने प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. "जर हे ट्रक 12 च्या आत रस्त्यावर दिसले, तर मनसे कार्यकर्ते ते फोडून टाकतील, असा इशारा देण्यात आलाय.
उपमुख्यमंत्र्यांचा आदेश पाळणार नसाल तर...
अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषदेत म्हणाले की, "उपमुख्यमंत्र्यांचा आदेश पाळणार नसाल, तर कोणाचा आदेश पाळणार? सरकार प्रशासन चालवत आहे की राजकीय नेते चालवत आहेत. या अशाच प्रकारचे आदेश परिवहन मंत्र्यांनी दिले होते. दुसऱ्या दिवशी देखील अवजड वाहने चालू होते. उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर सुद्धा तेच सुरू आहे. आज कारवाई करा, मी फोटो देतो. आदेश पाळले जात नाही. एक, दोन अधिकारी निलंबित झाले पाहिजे, असे त्यांनी म्हटले.
राज ठाकरेंचा आवाज म्हणून ठाणेकरांसमोर जाणार : अविनाश जाधव
अविनाश जाधव पुढे म्हणाले की, आम्ही ट्रॅफिक मार्च काढत आहोत. ठाण्याच्या ट्रॅफिकवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मोर्चा काढत. आमच्या मोर्चाने लगेच क्रांती होणार नाही. हा सर्व सामान्यांचा आक्रोश आहे. मला राज ठाकरे यांनी बोलायला आवाज दिला आहे. त्यांचा आवाज म्हणून ठाणेकरांसमोर जाणार आहे. आज ना उद्या ठाणेकरांना वाहतूक कोंडीतून मी बाहेर काढणारच असे देखील त्यांनी म्हटले.
सरकार नियमांचे पालन का करत नाही?
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. याबाबत विचारले असता अविनाश जाधव म्हणाले की, सीसीटीव्हीद्वारे लक्ष नाही तर सीसीटीव्हीद्वारे वसुली केली जाणार आहे. ते काम वसुलीचे आहे. शिस्त लावायला या गोष्टी झाल्या पाहिजेत. पण, जे अवजड वाहन येतात, एकावर एक चार लेन उभ्या राहतात. त्यांच्यावर का कारवाई होत नाही? तिथे का नियमांचे पालन होत नाही? सरकार नियमांचे पालन का करत नाही? नियम फक्त आम्हीच का पाळायचे? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
आणखी वाचा