मुंबई : भारती एअरटेल (Bharti Airtel) आणि टाटा समूहाने (Tata Group) आज जाहीर केले की ते भारतात 5 जी नेटवर्क सोल्यूशन (5G Network Solutions) तयार करतील. म्हणजेच, आता परदेशी किंवा चीनी ऐवजी स्वदेशी 5G नेटवर्क उपलब्ध होणार आहे.  टाटा समूहाने 'अत्याधुनिक' ओ-आरएएन आधारित रेडिओ आणि एनएसए / एसए कोर विकसित केले आहेत. हे तंत्रज्ञान जानेवारी 2022 पासून व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध असणार आहे.


जानेवारी 2022 पासून एअरटेल टाटा ग्रुपच्या या तंत्रज्ञानाचा वापर भारतात 5 जी लॉन्च करण्याच्या योजनेसाठी करणार आहे. सुरुवातीला हा पायलट प्रोजेक्ट म्हणून चालवला जाईल आणि भारत सरकारने जारी केलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचीही दखल घेतली जाईल. ही 5 जी उत्पादने आणि सोल्यूशन्स जागतिक मानके (Global Standerds) लक्षात ठेवून बनवली जात आहेत. जर 5 जी सोल्यूशन्स एअरटेलच्या पायलट प्रोजेक्टमध्ये त्यांचे कौशल्य सिद्ध करू शकले तर त्यांचा निर्यातीचा मार्गही मोकळा होणार आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) 3 जीपीपी (3GPP) आणि ओ-आरएएन (O-RAN) या दोन्ही मानकांसाठी एंड-टू-एंड सोल्यूशन्समध्ये मदत करते.


भारत आणि दक्षिण आशियातील भारती एअरटेलचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल विठ्टल यांनी म्हटलं की, 5 जी आणि संबंधित तंत्रज्ञानाचे भारताला जागतिक केंद्र बनवण्यासाठी आम्ही टाटा समूहाबरोबर काम करत आहोत, याचा आम्हाला आनंद आहे. भारत जगासाठी अत्याधुनिक सोल्यूशन्स तयार करण्यास योग्य स्थितीत आहे. यामुळे भारताला नाविन्यपूर्ण आणि निर्मितीच्या ठिकाण बनण्यास मदत करेल. 


टीसीएसचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर एन. गणपति सुब्रमण्यम यांनी म्हटलं की, आम्ही 5 जी आणि त्याच्या संभाव्यतेबद्दल उत्साहित आहोत. जागतिक स्तरावरील नेटवर्किंग उपकरणे आणि सोल्यूशन व्यवसाय तयार करण्याचे आमचे लक्ष्य आहे. या वर्षाच्या सुरूवातीस, एअरटेल आपल्या लाईव्ह नेटवर्कवर 5 जी प्रदर्शित करणारी देशातील पहिली टेलिकॉम कंपनी बनली होती. टेलिकॉम विभागाने दिलेल्या स्पेक्ट्रमचा वापर करून कंपनीने मोठ्या शहरांमध्ये 5G चाचण्या सुरू केल्या आहेत.