मुंबई : ज्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेत विमा काढलेला नाही, अशा शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतंर्गत भरपाईची जी रक्कम दिली जाते, त्या रकमेच्या 50 टक्के रक्कम शासनाकडून मदत म्हणून देण्यात येणार आहे. या निर्णयाचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे.


राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.

जून ते ऑक्टोबर 2016 या कालावधीत राज्यातील काही जिल्हयांमध्ये अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेतीपिके आणि फळपिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला होता. या निर्णयाच्या अनुषंगाने आज महसूल विभागाने याबाबतचे आदेश दिले आहे.

या निर्णयाचा लाभ शेतकऱ्यांना होण्यासाठी नुकसानीच्या मदतीची रक्कम थेट खातेदाराच्या बॅंक बचत खात्यात जमा करण्यात यावी, शेत जमिनीच्या झालेल्या नुकसानीची मदतीची रक्कम खातेदारांच्या बँक खात्यावर थेट जमा करतांना मदतीच्या रकमेमधून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करु नये असेही या आदेशात म्हटले आहे.