Solapur News : सोलापूर एमआयडीसी आग दुर्घटनेत चक्रावणारा निर्णय, पोलिसांकडून कारखान्याच्या मृत मालकावरच गुन्हा दाखल
Solapur News : सोलापूर एमआयडीसी परिसरातील सेंट्रल इंडस्ट्री या फॅब्रिकेशन कारखान्यात 18 मे रोजी भीषण आग लागली होती. या आगीत तब्बल 8 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता.

Solapur News : सोलापूर एमआयडीसी (Solapur MIDC) परिसरातील सेंट्रल इंडस्ट्री या फॅब्रिकेशन कारखान्यात 18 मे रोजी भीषण आग लागून झालेल्या दुर्घटनेला अखेर 18 दिवस उलटल्यानंतर पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला आहे. या आगीत तब्बल 8 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता. याप्रकरणात मृत मालकासह त्याचा मुलगा व सून यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, कारखान्याच्या इमारतीत अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. बांधकाम करताना सुरक्षेचे कोणतेही निकष पाळले गेले नाहीत. मार्जिन न सोडणे, कामगारांना निवासासाठी परवानगी नसताना इमारतीत ठेवणे आणि अग्निशमन सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना न करणे आदी गंभीर त्रुटीमुळे ही दुर्घटना घडल्याचे निष्पन्न झाले आहे.
या पार्श्वभूमीवर, सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्यात कारखान्याचे मालक उस्मानभाई मन्सुरी (मृत), त्यांचा मुलगा हनीफ उस्मानभाई मन्सुरी आणि सून इशरत हनीफ मन्सुरी यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 106 (1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर एमआयडीसी, अग्निशमन विभाग, व सोलापूर महापालिकेच्या बांधकाम विभाग यांनी संयुक्तपणे तपास करून अहवाल सादर केला. यानंतर पोलीस उपनिरीक्षक विजय बनसोडे यांनी या प्रकरणात फिर्याद दाखल केली आहे.
नेमकं काय घडलं होतं?
अक्कलकोट रोड एमआयडीसीतील सेंट्रल इंडस्ट्रीज या कारखान्याला 18 मे रोजी पहाटे चारच्या सुमारास भीषण आग लागली. कारखान्याचे मालक उस्मान हसन मन्सुरी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य याठिकाणीच वास्तव्यास होते. तसेच, चार कामगारही कारखान्यातच राहायचे. टॉवेलच्या कच्च्या मालाला आग लागल्यामुळे ती वेगाने पसरली आणि भडकली. आग इतकी झपाट्याने पसरली की, आतमध्ये अडकलेल्या आठ जणांना बाहेर पडता आले नाही.
घटनेची माहिती मिळताच अक्कलकोट एमआयडीसी केंद्रातील सोलापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाचा एक बंब तातडीने घटनास्थळी पोहोचला. मात्र आगीचे भयावह स्वरूप पाहून अन्य केंद्रांतील अग्निशमन बंबांना देखील पाचारण करण्यात आले. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असताना पाण्याच्या कमतरतेमुळे अडथळे निर्माण झाले. या दरम्यान, मेहताब बागवान, त्यांची मुलगी हिना वसीम शेख आणि मुलगा सलमान मेहताब बागवान या तिघांचे मृतदेह सकाळीच सापडले. दुपारपर्यंत सुरू असलेल्या शोधमोहीमेदरम्यान कारखान्याचे मालक उस्मान मन्सुरी, त्यांचा नातू अनस, नातसून शिफा मन्सुरी, नातवाचा मुलगा युसूफ आणि कामगार मेहताब बागवान यांची पत्नी आयेशा बागवान यांचे मृतदेह सापडले होते. या दुर्घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली गेली.
आणखी वाचा

























