सोलापूर : मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आलं आहे. मात्र तरीसुद्धा अनेक जण व्हीआयपी दर्शनासाठी धडपड करताना दिसतात. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी आपल्या 21 कार्यकर्त्यांना दर्शन देण्यासाठी मंदिर समितीला पत्र लिहिलं. एकीकडे विठुरायाच्या दर्शनासाठी एक लाखाहून अधिक भाविक रांगेत उभे आहेत तर दुसरीकडे आपल्या कार्यकर्त्यांना दर्शन मिळावं म्हणून आमदारच प्रयत्न करत असल्याचं समोर आलं आहे. 

शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी पंढरपूर देवस्थान समितीला एक पत्र दिलं. त्यामध्ये 21 जणांच्या नावाची यादी आहे. या सर्वांच्या दर्शनाची व्यवस्था करावी अशी विनंती आमदार संतोष बांगर यांनी केली. एकीकडे आषाढीच्या निमित्ताने एक लाखाहून अधिक भाविक दर्शनाच्या रांगेत उभे असतानाच राजकीय नेते मात्र आपल्या कार्यकर्त्यांना व्हीआयपी दर्शन मिळावे यासाठी आग्रही असल्याचं दिसून येतंय. 

Pandharpur Ashadhi Wari 2025 : पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढली

आषाढी सोहळ्यासाठी राज्यभरातून निघालेले सात मानाचे पालखी सोहळे आणि इतर संतांच्या पालख्या जसजशा पंढरपूरच्या जवळ पोहोचू लागल्या तशी भाविकांची दर्शनासाठी गर्दी वाढू लागली आहे. शुक्रवारी देवाचा पलंग निघाल्यानंतर 24 तास दर्शन सुरू झाले. त्यामुळे देवाच्या दर्शनाची रांग थेट गोपाळपूरच्या बाराव्या पत्रा शेडच्या पुढे गेली आहे. दर्शन रांगेत एक लाखापेक्षा जास्त भाविक उभे आहेत.

गजानन महाराजांची पालखी तुळजापुरात

आषाढी एकादशीसाठी शेगावमधून पंढरपूरकडे निघालेल्या श्री गजानन महाराज पालखी दिंडीचे श्री क्षेत्र तुळजापूरमध्ये भव्य स्वागत करण्यात आलं. यावेळी मंदिर संस्थानच्या वतीने दिंडीतील सर्व वारकऱ्यांसाठी एक वेळच्या जेवणाचा शिधा प्रदान करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा यंदाही भक्तिभावाने जपली गेली. विठुनामाच्या गजराने आणि तुळजाभवानी देवीचा उद्घोष करत आलेल्या दिंडीमुळे संपूर्ण तुळजाभवानी मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन गेला होता.

जामखेडमध्ये रिंगण सोहळा पार

गहिनीनाथ गडावरुन निघालेला श्री संत वामनभाऊ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे रिंगण अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये पार पडलं. निसर्गसौंदर्याच्या कुशीतून चाललेली दिंडीसोबत टाळ-मृदुंगाची साथ, श्रद्धा-समर्पण आणि भक्तिभावाने भारलेली हजारो वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. श्री संत वामनभाऊ महाराज हे वारकरी संप्रदायातील थोर संत आहेत. त्यांच्या पालखी सोहळ्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे हा संपूर्ण सोहळा फक्त एकाच दिंडीचा आहे.

ही बातमी वाचा: