पंढरपूर: दर तीन वर्षातून येणार अधिक मास अर्थात पुरुषोत्तम मास हा वारकरी संप्रदायाची पर्वणी काळ असतो. यात शनिवारी होणाऱ्या अधिक महिन्यातील एकादशी असल्याने लाखो भाविकांनी पंढरपूरमध्ये गर्दी केली आहे. तसे तर अधिक महिना सुरु झाल्यापासून शहरात रोज दोन लाखापेक्षा जास्त भाविक येत आहेत. यातच शनिवार, रविवार या जोडून सुट्ट्या आल्यावर हा एकदा तीन ते चार लाखापर्यंत जात आहे. 


शनिवारी या पुरुषोत्तम मासातील एकादशी असल्याने ही पर्वणी गाठण्यासाठी पाच लाखापेक्षा जास्त भाविक सध्या पंढरपूरमध्ये दाखल झाले असून अजूनही हजारोंच्या संख्येने भाविकांचे येणे सुरूच आहे. यामुळे आज विठुरायाच्या दर्शनाची रांग थेट गोपाळपूर येथील तिसऱ्या पत्राशेडपर्यंत गेली असून डोक्यावर रिमझिम पाऊस सुरु असूनही भाविक दर्शन रांगेत गर्दी करत आहेत. 


आज सकाळपासून चंद्रभागेच्या पवित्र स्नानासाठी हजारो भाविकांनी वाळवंटात गर्दी केली होती. मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग आणि दर्शन रांगेत तुफानी गर्दी दिसत असल्याने एका महिन्यात दुसरी आषाढी आल्याचे चित्र दिसू लागले आहे. दरम्यान आज मंदिर समितीच्या वतीने दर्शन रांगेतील भाविकांना नाश्ता आणि चहाचे वाटप सुरु करण्यात आले आहे. 


अधिक मासातील 30 पूजा बंद करण्याचा निर्णय 


अधिक महिन्यासाठी विठुरायाच्या (Vitthal) रोज होणाऱ्या 45 तुळशी अर्चन पूजेपैकी 30 पूजा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एबीपी माझाच्या दणक्यानंतर हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता जास्तीत जास्त भाविकांना देवाच्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. 


एबीपी माझाने वाचा फोडल्यानंतर मंदिर समितीचा निर्णय


अधिक मास काळात रोज होणाऱ्या 10 पाद्यपूजा बंद करण्याचा निर्णय झाला होता. मात्र रोज होणाऱ्या 45 तुळशी अर्चन पूजेबाबत मात्र कोणताच निर्णय न झाल्याने भाविकांना दर्शन रांगेत तिष्ठत थांबावे लागणार होते. याबाबत भाविकांच्या भावनांना एबीपी माझाने वाचा फोडल्यानंतर अखेर मंदिर समितीने रोज होणाऱ्या 45 पैकी 30 पूजा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.


भाविकांना दर्शनासाठी मिळणारा वेळ वाढणार


हा पुरुषोत्तम मास यावर्षी चातुर्मासाच्या कालावधीत येत असल्याने रोज यात्रेसारखी भाविकांची गर्दी असते. अशावेळी जास्तीत जास्त  भाविकांना दर्शनासाठी वेळ मिळावा म्हणून महिनाभर रोजच्या 45 तुळशी अर्चन पूजा बंद करण्याची मागणी भाविकांतून होत होती. आता मंदिराने रोजच्या 30 पूजा रद्द केल्याने भाविकांना दर्शनासाठी मिळणारा वेळ वाढणार आहे. 


ही बातमी वाचा: