Pandharpur News : पंढरपूरकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुणे परिसरातील पाऊस थांबल्याने उजनीतून (Ujni Dam) सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग हा कमी होण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी पंढरपूरवरील महापुराचा धोका टळला आहे. मात्र, असे असले तरी चंद्रभागा ही धोक्याच्या पातळीजवळ पोहोचली असून सध्या पात्रात एक लाख 90 हजार क्युसेक विसर्गाने पाणी वाहत आहे.
दरम्यान, पुणे परिसरातील पाऊस कमी झाल्याने उजनी धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग कमी होण्यास सुरुवात झाली आहे. आज सकाळी उजनी धरणातून एक लाख पस्तीस हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडले जात आहे. मात्र उजनीकडे येणारा विसर्ग 80 हजारपर्यंत कमी झाल्याने आज दुपारपर्यंत भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग ही कमी होणार आहे. मात्र चंद्रभागा आपल्या रौद्ररूपात वाहत असताना भाविक अत्यंत धोकादायक पद्धतीने स्नान करतानाचे धक्कादायक चित्र अनेक घाटांवर दिसत आहे.
दुसरीकडे. काल (22 ऑगस्ट) सोडलेल्या पाण्यामुळे कर्नाटककडे जाणाऱ्या गोपाळपूर येथील पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने कर्नाटकची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे.
पाण्याचा अंदाज न आल्याने नालासोपाऱ्यात युवक प्रवाहात वाहून गेला; पाण्यात बुडून मृत्यू
मुसळधार पावसामुळे दिनांक 20 ॲागस्टला निर्माण झालेल्या पुरस्थितीत नालासोपाऱ्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. नालासोपारा पश्चिम येथील डिमार्टजवळील नाल्यात वाहून गेलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून मृताचे नाव रमेश जयणारायन तिवारी (वय 55) असे आहे. तो सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, 20 ऑगस्ट रोजी संध्याकाळी कामावरून घरी परतताना, परिसरात साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने रमेश तिवारी हा नाल्यात पडला आणि पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला. त्या रात्री तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. दरम्यान काल (गुरुवारी) नालासोपारा पश्चिम हनुमान नगर भागातील डिमार्टजवळील नाल्यात एक मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला असता, तो रमेश तिवारी यांचा असल्याचे स्पष्ट झालं. प्राथमिक तपासात ते पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे समोर आलं आहे. पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुरस्थितीतील सुरक्षेबाबत स्थानिक प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
संबंधित बातमी: