Solapur News : सोलापूर जिल्ह्यातून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात तिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने एका वृद्ध शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केलीय. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथील ही धक्कादायक घटना आहे. चंद्रकांत माळगे असे आत्महत्या केलेल्या 75 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे. गेल्या काही दिवसांत सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांची मोठी हानी झाली. परिणामी आर्थिक नुकसान आणि त्यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलायचे बोललं जात आहे. मात्र या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती, तांदूळवाडी, पिंजरवाडी, संगदरी या परिसरात देखील यंदा अतिवृष्टी झाली. सततच्या पावसाने खरीप हंगामातील पिके नष्ट झाली. हाती काहीच लागणार नाही या विवंचनेत शेतकरी चंद्रकांत माळगे होते. त्यातच शेतीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे असा विचार त्यांना सारखा सतावत होता. त्यातूनच त्यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती माळगे यांच्या नातेवाईकांनी दिली. दरम्यान या प्रकरणी सिव्हिल पोलीस चौकीत नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करतायत.

मराठा आंदोलनाचा परिणाम; मुंबईच्या भाजी मार्केटमध्ये भाज्यांचे दर कडाडले

मुंबईतील मराठा आंदोलनात मोठ्या संख्येने राज्यभरातील शेतकरी सहभागी झाले आहे. परिणामी शेतातील माल हा शेतातच पडून असल्याने आवक ही कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात भाज्यांचे दर सुद्धा वाढलेले आहेत. शिवाय वाहतूक कोंडीमुळे सुद्धा मोठा परिणाम मार्केटमध्ये जाणवत असल्याचं विक्रेत्यांचे म्हणणं आहे. जोपर्यंत मराठा आंदोलन मागे घेतले जात नाही आणि शेतकरी शेतात जात नाहीत, तोपर्यंत असाच परिणाम जाणवत राहील, असं विक्रेत्यांचे म्हणणं आहे. जवळपास 40% आवक ही कमी झाली आहे. त्याचा परिणाम बाजारपेठेवर झाला असून भाज्यांचे दर कडाडले आहे.

खरीप पिकाला कीड अन् आळ्यासह पावसाचा दुहेरी फटका

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार वाशिम जिल्ह्यात सर्वदूर सायंकाळी पाच वाजेपासून जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. बसणाऱ्या पावसामुळे खरिपाची उरली सुरली पिक धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या सोयाबीन पिकांची शेंगा भरण्याचा कालावधी असून या काळामध्ये मोठ्या प्रमाणात कीड अळ्यांचा प्रादुर्भाव होत आहे. मात्र, सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतात रासायनिक फवारणी करणे शक्य नाही. त्यामुळे खरीप पिकाला कीड आळ्याचा आणि पावसाचा असा दुहेरी फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या