Satara Jilha Parishad: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या राड्यानंतर आज (4 मार्च) पुन्हा सभापती निवडीवरून जिल्हा परिषदेत वादंग उठले. भाजपने केलेली फोडाफोडी आणि जिल्हा प्रशासन यांच्या भूमिकेचा निषेध करत राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी सभापती निवडीवर बहिष्कार टाकला. बहिष्कार, घोषणाबाजी आणि थेट आंदोलनामुळे राजकारण तापलं असून आता हा संघर्ष उघडपणे ‘तू-तू, मी-मी’पर्यंत पोहोचला. साताऱ्यात पुन्हा एकदा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी, शिवसेना संघर्ष पेटला आहे. या वादानंतर जिल्ह्यातील मंत्री शंभूराज देसाई, मंत्री मकरंद पाटील एका बाजूला तर विरोधात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. 

Continues below advertisement

भाजपकडून प्रत्येक सभापतीपदासाठी एकच अर्ज आल्याने निवड बिनविरोध झाल्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी घोषित केले. महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीच्या ऋतुजा विराज शिंदे यांची निवड झाली. समाज कल्याण समितीच्या सभापतीपदाची धुरा ऋषीकेश धायगुडे-पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली. विषय समिती सभापती म्हणून लता अविनाश कर्णे आणि तेजस्विनी विक्रमशील कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 

आगे आगे देखो होता है क्या 

राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी काळ्या फिती लावून सभापती निवडीच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतला. भाजप आणि जिल्हा प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत सभागृहात प्रवेश केला आणि काही वेळात सभागृहातून बाहेर पडून जिल्हा परिषदेच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. या घटनेनंतर मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन भाजपचे मंत्री जयकुमार गोरे आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर टीका केली. शंभूराज देसाई यांनी सभापती निवड झाली म्हणजे जिल्हा परिषदच्या राजकारणाचा कालावधी संपला असं होत नाही. कालावधी पाच वर्षाचा आहे. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो असं सांगत आगे आगे देखो होता है क्या असा इशारा देसाई यांनी दिला.

Continues below advertisement

आम्ही काल राजकारणात आलो नाही 

मकरंद पाटील यांनी सांगितले की, राजकारणामध्ये जय पराजय हे होत असतात. आज आमचे सदस्य जरी फोडले असले तरी ही वेळ त्यांच्यावर येणार आहे. आम्ही काल राजकारणात आलेलो नाही हे तुम्ही समजून घ्या. माझ्या कुटुंबात 50 ते 60 वर्ष जिल्ह्याच्या राजकारणाचा वारसा आहे. 100 टक्के याचे प्रतिउत्तर दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा पाटील यांनी दिला.

जाणीवपूर्वक सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न 

शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्या टीकेला मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी उत्तर दिले. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा जिल्हा परिषदेत आमचं बहुमत असताना देखील आम्हाला जाणीवपूर्वक सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सुरू होता, असे सांगितले. आम्ही पहिल्यापासून सांगत होतो की अध्यक्ष उपाध्यक्ष हा आमच्याकडे बहुमत असल्यामुळे आमचाच होणार. बहुमत नसल्यामुळे त्यांनी बहिष्कार टाकला हे सिद्ध झालं आहे असे शिवेंद्रराजे म्हणाले. शंभूराज देसाई आरोप आमच्यावर करतात आणि धमकी देखील तेच देतात हे सातत्याने घडल आले आहे. आताही ते म्हणत आहेत अजून पाच वर्ष आहेत तर आम्हीही ते बघायलाच बसलो असल्याचे जयकुमार गोरे यांनी म्हटलं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या