Sangli Satyashodhak Wedding: सांगलीतील आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा, नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान
Sangli Satyashodhak Wedding: सामाजिक क्षेत्रात काम करत असताना या जोडप्याने फक्त सामाजिक सुधारणा होण्यासाठी प्रयत्न केले नाहीत तर स्वतःच अशा पद्धतीने लग्न करून अनेकापुढे आदर्श ठेवला आहे.

Sangli Satyashodhak Wedding: आजपर्यंत देशाच्या इतिहासात महाराष्ट्राची ओळख कायमच पुरोगामी राज्य म्हणून राहिली आहे. सांगलीतील एका आगळ्यावेगळ्या विवाहाने (Wedding) महाराष्ट्रातील ही ओळख अजूनही शाबूत असल्याचे नव्याने दाखवून दिले आहे. सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या जोडप्याचा एक आदर्शवत लग्नसोहळा नुकताच पार पडला. सूरज आणि मधूमिता या जोडप्याचा सत्यशोधक पद्धतीने आणि विवाहातील अनावश्यक खर्च टाळत लग्नासाठी (Marriage) वापरली जाणाऱ्या रक्कम सामाजिक संस्थांना मदत या भावनेतून साध्या पण अनेक सामाजिक संदेश देणारा लग्न सोहळा पार पडला. सुरज हा शिक्षण पर्यावरण आणि लैंगिक शिक्षण या सामाजिक प्रश्नावर काम करतो तर मधुमिता ही वृद्धाश्रम आणि बांधकाम कामगारांच्या मुलांच्या आरोग्य व शिक्षणावर काम करते. या दोघांनी आपल्या विवाहातील अनावश्यक खर्च टाळत काही रक्कम सामाजिक संस्थांना दान केली. (Sangli News)
ईश्वरपूरचा सुरज उर्मिला सुनील तर नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील मधुमिता शोभा-अर्जुन यांनी आडनाव न लावता सर्वजण समान या भावनेतून सामाजिक काम करणाऱ्या या दोघांनी आपल्या विवेकनिष्ट सहजीवनच्या नात्यास सुरुवात केली. लग्नात विवेक, समता, स्वातंत्र्य, बंधुता, प्रेम, सत्य, अहिंसा, पर्यावरण या सप्तपदीच्या पावलावर चालत त्यांनी आपल्या जीवनातील नव्या टप्प्याचा प्रारंभ केला. सुरज आणि मधुमिता यांची ओळख सामाजिक काम करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून झाली होती. या दोघांची मैत्री झाल्यानंतर पुढे त्यांचे आयुष्याविषयीचे विचार जुळू लागले. त्यामुळे या दोघांनी सत्यशोधक पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला.
सुरज आणि मधुमिता या दोघांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ही चांगली आहे. मात्र, तरीदेखील दोघांच्या कुटुंबीयांनी या लग्नाला आणि सत्यशोधक पद्धतीने लग्न करण्यास मंजुरी दिली. तसेच सामाजिक संस्थांना मदत हाच आमचा आहेर, असे म्हणत विवाहातील अनावश्यक खर्च टाळत जवळपास 2 लाख रुपये सामाजिक संस्थांना मदत म्हणून दिली . लग्नात यामुळे पुस्तक प्रदर्शन, विविध संस्थाच्या कामाची माहिती देणारे प्रधान आणि सत्यशोधक पद्धतीच्या विवाहाला पुरस्कृत करणारे विचार दिसून आले. सध्याच्या लाखो रुपये खर्चून भपकेबाज पद्धतीने लग्न करण्याच्या युगात सुरज आणि मधुमिता यांचा सत्यशोधक विवाह एक आदर्श घालून देणारा ठरला आहे.
मधुमिता ही वृद्धाश्रम आणि बांधकाम कामगारांच्या मुलांच्या आरोग्य व शिक्षणावर काम करते. तर सूरज शिक्षण, पर्यावरण आणि लैंगिक शिक्षण या विषयांवरील सामाजिक प्रश्नांवर काम करतो. नवीन गोष्टी शिकत समाज परिवर्तनासाठी आवश्यक जितकं जमतंय तितकं करण्याचा त्याचा प्रयत्न सुरु असतो. त्यामुळे लग्नाचं नियोजन करताना दोघांनी ठरवलं की अवाजवी खर्च टाळून तेच पैसे सामाजिक संस्थांना देऊ. लग्न एकदाच होतं हे आम्हालाही पटतंय, म्हणूनच एका दिवसात ते पैसे अक्षरशः उडवण्यापेक्षा ते विधायक पद्धतीने खर्च करुन लग्नं खऱ्या अर्थाने साजरा करु, स्मरणीय बनवू, ही संकल्पना आमच्या पालकांनीही उचलून धरली आणि ते मिळून 2 लाख रुपये संस्थांना देणगी दिली, असे या दोघांनी सांगितले.





















