सांगली : सध्या राज्यात काही झालं की सरकारला आणि राज्याचा अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जातोय. एक प्रकारे राज्यात अराजकता पसरवण्याचे काम काही लोक करत आहेत. तशी अराजकता निर्माण व्हावी यासाठी काही शक्ती काम करताहेत का असा प्रश्न पडतोय असं वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. सांगलीमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित झेंडावंदन सोहळ्यानंतर चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलत होते.
शक्तिपीठ महामार्गाला जो विरोध होतोय तो वाढत जातोय. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की, "जर कोयना धरण झालं नसतं तर आज महाराष्ट्राची वीज निर्मिती आणि शेतीला पाणी हे मिळालं नसतं. समृद्धी महामार्ग झाला नसता तर नागपूरहून मुंबईला आठ तासात शेतकऱ्यांचा शेतीमाल पोहोचला असता का?"
चांगली भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न
शक्तिपीठ महामार्ग वेगवेगळ्या प्रकारच्या तीर्थक्षेत्रांना जोडणारा रस्ता आहे. हा महामार्ग होत असताना बाधित शेतकऱ्यांना भरपाई योग्य मिळाली पाहिजे, त्यांचं पुनर्वसन योग्य झालं पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्तिपीठला विरोध बंद करावा आणि आपल्याला भरपाई कशी चांगली मिळेल याबाबत विचार करावा असे आवाहन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांना केले.
शक्तिपीठ महामार्गासाठी संपादन सुरू
राज्यातील 12 जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गासाठी 371 गावांमधील 8024 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. त्यापैकी 7625 हेक्टर खाजगी जमीन म्हणजेच शेतकऱ्यांची जमीन असणार आहे. तर 262 हेक्टर शासकीय आणि 123 हेक्टर वनक्षेत्राची जमीन असणार आहे.
सध्या सर्व 12 जिल्ह्यांमध्ये मोजणीची प्रक्रिया सुरु आहे. महामार्गाच्या सुरुवातीच्या म्हणजेच वर्धा, यवतमाळ आणि अंतिम टोकावरील सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात संयुंक्त मोजणी प्रक्रिया जवळपास पूर्ण होत आली आहे. सोलापूरमध्ये ही मोजणीचे काम समाधानकारकरीत्या प्रगतीपथावर आहे.
महामार्गाच्या मधल्या टप्प्यात म्हणजेच नांदेड, हिंगोली, परभणी, बीड धाराशिव या जिल्ह्यात अल्प गतीने मोजणीचे काम सुरु आहे. तर लातूर, सांगली आणि खासकरून कोल्हापूरमध्ये शेत जमिनीच्या मोजणीच्या कामाला तीव्र विरोध असल्याने या ठिकाणी मोजणी अत्यंत संथ गतीने सुरु आहे. अजून सरकार ने जमिनीसाठी किती मोबदला दिला जाईल त्याचे सूत्र जाहीर केलेले नाही.
ही बातमी वाचा: