Aaditya Thackeray : शिवसेनेच्या बंडखोरीनंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी निष्ठा यात्रेतील पुढील टप्प्याची सुरुवात रत्नागिरीतून (Ratnagiri) केली. यावेळी आपल्या भाषणात आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला. राज्यातून बाहेर जाणारे प्रकल्प रोखण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे आदित्य यांनी म्हटले. मुख्यमंत्री गणपतीत 250 मंडळं फिरली, आता पुन्हा त्यांना दांडिया, गरबासाठी सगळी फिरायचे असेल. मात्र, त्याआधी त्यांनी राज्यातील प्रकल्पांकडे लक्ष द्यावे, अशा शब्दांत आदित्य यांनी हल्लाबोल केला. राज्याच्या उद्योगमंत्र्यांना वेदांता-फॉक्सकॉनच्या प्रकल्पाबाबत काहीही माहिती नसणे हे धक्कादायक असल्याचे आदित्य यांनी म्हटले. 


वेदांता-फॉक्सकॉनच्या मुद्यावर आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. आताच्या उद्योगमंत्र्यांना या प्रकल्पाबाबत काहीच माहित नव्हते. या प्रकल्पासाठी मविआ सरकारकडून प्रयत्न सुरू होते असेही आदित्य यांनी म्हटले. जूनमध्ये वेदांता-फॉक्सकॉन कंपनीने तळेगावची जागा पाहिली. राज्यात दीड लाख कोटींची गुंतवणूक येणार होती. त्याशिवाय, एक लाख रोजगार येणार होते. वेदांता-फॉक्सकॉन तळेगावात येणार होते. गद्दारांनी सरकार पाडल्यानंतरही एमआयडीसीने प्रकल्पासाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता. मात्र, या सरकारने काहीच प्रयत्न केले नसल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. 


आदित्य ठाकरे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला. वेदांता प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर उद्योग मंत्र्यांना याबाबत विचारल्यावर माहिती घेऊन सांगतो असे त्यांनी म्हटले. मी 32 वर्षाचा तरूण असून या प्रकल्पाबाबत माहिती देतो. मात्र, तुम्ही काहीच माहिती देऊ शकत नाही का, असा सवाल आदित्य यांनी केला. 


रायगडमध्ये येऊ घातलेला बल्क ड्रग्ज प्रकल्पही राज्याबाहेर गेला. त्यामुळे 80 हजार तरुणांचा रोजगार गेला असल्याचे आदित्य यांनी सांगितले. बल्क ड्र्ग्ज प्रोजेक्ट राज्याबाहेर गेला. त्याचीही त्यांनाही माहिती नव्हती हे धक्कादायक असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. 


मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका



आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीकास्त्र सोडले. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्रान्सहार्बर लिंकला भेट दिली. मात्र, त्यांना काही प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी फाइल पाहण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्र्यांना प्रकल्पाबाबत काही माहिती नाही असेही आदित्य यांनी म्हटले. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने दवाखान्यांची योजना सुरू करण्याचे जाहीर केले होते. मात्र, ही योजना मुंबई महापालिकेच्या निधीवर सुरू करण्यात आल्याची आठवणही आदित्य यांनी करून दिली.