Raigad Guardian Minister : अदिती तटकरेच रायगडमधील जनतेच्या मनातील पालकमंत्री; अनिकेत तटकरेंचं वक्तव्य; राष्ट्रवादी-शिवसेनेत पुन्हा तू-तू,मैं-मैं?
Raigad Guardian Minister : रायगडच्या पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे आणि शिंदे गटाचे भरत गोगावले यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु आहे.

Raigad Guardian Minister : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 18 जानेवारी रोजी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती. या यादीनुसार नाशिकसाठी भाजपचे गिरीश महाजन (Girish Mahajan) तर रायगडसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, या घोषणेनंतर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) आणि मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. परिणामी, केवळ 24 तासांत नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदांसंदर्भातील निर्णय तात्पुरता स्थगित करण्यात आला. सध्या महायुतीमध्ये नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. आता रायगडच्या पालकमंत्रिपदावरून मंत्री अदिती तटकरे यांनी मनातील खदखद बोलून दाखवली आहे. तर माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत मोठा दावा केला.
अदिती तटकरेच रायगडमधील जनतेच्या मनातील पालकमंत्री : अनिकेत तटकरे
अदिती तटकरे या रायगडच्या जनतेच्या मनातील पालकमंत्री आहेत, असा दावा विधानपरिषदेचे माजी आमदार आणि सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांनी केला आहे. त्यामुळे पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादी आग्रही असल्याचे या विधानावरून दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेत पुन्हा तू तू-मै मै होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नेमकं काय म्हणाल्या अदिती तटकरे?
रायगड जिल्ह्याला राजकीय गैरसमजातून पालकमंत्रिपद मिळालेलं नाही. त्यामुळे जिल्हा नियोजनाची बैठक होत नसल्याने निधीचा अभावी राहाव लागत असल्याची खदखद महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केली. रोहा येथे अजितदादांच्या राष्ट्रवादीची कार्यकारिणी आढावा सभा झाली, या सभेत त्या बोलत होत्या. शिवाय पालकमंत्री नसल्यामुळे इतर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायतींना विकासात्मक दृष्ट्या तरी वंचित ठेऊ नका, अशी विनंती देखील अदिती तटकरे यांनी महायुतीतील वरिष्ठ नेत्यांना केली. राज्याचे तिन्ही नेतृत्व हे रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत जेव्हा योग्य निर्णय घ्यायचा तेव्हा घेतील. परंतु, रायगड जिल्ह्याला विकासापासून वंचित ठेऊ नका, असेही त्यांनी म्हटले. यावेळी आदिती तटकरे यांच्या भाषणातून पालकमंत्रिपदाची उत्कंठा जाणवून आली.
भरत गोगावले पालकमंत्री होणे हा आमचा अधिकार : महेंद्र दळवी
दरम्यान, काही दिवसांपूर्वी रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी वक्तव्य केले होते. मंत्री भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री होणे, हा आपला अधिकार आहे, असा आग्रह महेंद्र दळवी यांनी अलिबागमधील शिवसेनेच्या आढावा बैठकीत केला होता. पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावले यांनी अनेक वेळा त्याग केलाय. मागचे सरकार बनवण्यात भरत गोगावले यांचा हातखंडा असताना सुद्धा त्यांना मंत्रीपद मिळू शकले नाही. सुनील तटकरे यांची नियत ही आपल्याच पदरात पाडून घेण्याची आहे. मात्र, त्यांचा या वृत्तीला आता छेद करण्याचं काम आपल्याच माध्यमातून करू, असा इशारा महेंद्र दळवी यांनी खासदार सुनील तटकरे यांना दिला होता.
आणखी वाचा























