Vilas Lande  : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला काही दिवसांपुर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये मोठं खिंडार पडलं. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. ४ पदाधिकाऱ्यांसह एकूण २४ जणांनी शरद पवारांच्या उपस्थितीत (Sharad Pawar) पक्षात प्रवेश केला. यामध्ये माजी आमदार विलास लांडेंचे निकटवर्तीय अजित गव्हाणेंचा देखील समावेश होता. त्यांच्या शरद पवार गटातील प्रवेशानंतर गुरू विलास लांडेंनी तुतारी फुंकणाऱ्या कट्टर समर्थक अजित गव्हाणेंना लक्ष केलं आहे. 


माजी आमदार विलास लांडेंनी अजित गव्हाणेंवर बोलताना म्हटलं, 'अजितदादांनी शहरातील माझ्यासह अनेकांना पद देऊन मोठं केलं. मात्र दादा तुमच्या पुढं पुढं करणारे मोठे होऊन, तुम्हाला सोडून जातात. याची मला खंत आहे. दादा आता तुम्ही कडक शब्दात त्यांना समज द्या. ज्याला थांबायचं त्याने थांबावं नसेल तर सोडून जावं, असं म्हणत अजित गव्हाणेंवर विलास लांडेनी टीका केली आहे. दरम्यान विलास लांडेंच्या मार्गदर्शनाने मी शरद पवार गटात गेल्याचा दावा गव्हाणेंनी केला होता, मात्र आता विलास लांडेंनी गव्हाणेंना लक्ष केल्याचं दिसून येत आहे. 


अजित गव्हाणेंनी अजितदादांची साथ सोडून शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय का घेतला?



अजित गव्हाणे एबीपी माझाशी बोलताना म्हणाले, पिंपरी चिंडवडमध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता होती. तेव्हा अतिशय चांगल्या प्रकारे काम झालं होतं. गेल्या २०१७ साली झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपची सत्ता आली. तेव्हापासून पिंपरी चिंचवड शहराची मोठ्या प्रमाणावर अधोगती झाल्याचं चित्र दिसून येत आहे. विशेष म्हणजे भोसरी विधानसभा हा भाग सर्वांत जास्त मागे पडलेला आहे. सत्ता असताना देखील काही विकासकामे झालेली नाहीत. एकहाती सत्ता अजित पवारांकडे (Ajit Pawar) नव्हती. त्याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अशी परिस्थिती दिसून येत आहे, त्यामुळे आम्ही अजित दादांना सोडून शरद पवारांसोत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे अजित गव्हाणे यांनी सांगितलं आहे. 


बालेकिल्ल्यात धक्का बसल्यानंतर अजित पवार अॅक्शन मोडमध्ये



पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धक्का बसल्यावर अजित पवार (Ajit Pawar) खडबडून जागे झाल्याचं चित्र आहे. शहराध्यक्ष अजित गव्हाणेंनी घड्याळ सोडून शरद पवारांची तुतारी फुंकल्यानंतर अजित पवारांनी (Ajit Pawar) तातडीने उर्वरित पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. त्यानंतर आता डॅमेज कंट्रोलसाठी अजित पवार बालेकिल्ल्यात विशेष लक्ष देत आहेत. आज ते पिंपरी चिंचवडमध्ये मेळावा घेत आहेत.