पुणे : लोकसभा निवडणुकीत शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठं यश मिळालं. राज्यात महाविकास आघाडीला 30 जागा जिंकता आल्या, तर महायुतीला केवळ 17 जागांवर यश मिळालं आहे. त्यामुळे, महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. त्याच, पार्श्वभूमीवर उपराकार लेखक आणि माजी आमदार लक्ष्मण माने (Laxman mane) यांनी शरद पवार यांची भेट घेऊन अभिनंदन केले. यावेळी, एससी समाजाच्या जागांवर इतर समाजाचे लोकं खोट्या प्रमाणपत्राच्याआधारे निवडून येत असल्यावरुन त्यांनी संताप व्यक्त केला. तसेच, नवनीत राणा यांच्या नावाचा उल्लेख करत राखीव जागांवरुन खोट्या प्रमाणपत्राचा वापर होत असल्याचेही मानेंनी म्हटले. 


उपराकार लक्ष्मण माने यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर, माने यांनी पत्रकारांशी बोलताना आश्चर्यकारक मागणी केली आहे. राजकीय राखीव जागा बंद कराव्यात अशी माझी मागणी असल्याचं माने यांनी म्हटलं. राखीव जागेवर लबाडी करून नेते लढत आहेत, लिंगायत समाज आणि धनगर समाजाचे लोक जर एससीचे प्रमाणपत्र घेऊन जागा लढत असतील तर तो त्या समाजावरतील अन्याच आहे ना, असा सवाल लक्ष्मण माने यांनी उपस्थित केला. ज्यांना प्रतिनिधी म्हणून निवडून जायला पाहिजे ते या जागांवरून निवडून जात नाहीत, म्हणून राखीव जागा बंद केल्या तरी माझा पाठिंबा आहे, असे लक्ष्मण माने यांनी म्हटलं.


सत्तेचं विकेंद्रीकरण व्हायला पाहिजे, सत्तेचं विकेंद्रीकरण न झाल्यास इथून पुढच्या काळात देश चालणं शक्य नाही. या देशात 60 ते 65 टक्के लोकं हे मागासवर्गी आहेत, त्यामुळे मागसवर्गीयांना सत्तेत स्थान दिलं पाहिजे. आजही वरच्याच समाजातील लोकाचां आग्रह असेल, तर 8 पैकी 6 ते 7 माणसं एकाच जातीची असतील तर ही चिंतेची बाब आहे. गरीब, मागासवर्गीय समाजातील माणसांनी राजकारणात यायचंच नाही का, सध्या मध्यमवर्गीय माणूस निवडणुकीला पात्र नाही, खालचा तर सोडाच, कारण निवडणुकींसाठी किती खर्च लागतो, ज्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्यासाठीच राजकारण आहे, असे म्हणत लक्ष्मण माने यांनी खंत व्यक्त केली. दरम्यान, मी पवार साहेबांना भेटत असतो, आता झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाला अभूतपूर्व यश मिळाले आहे. तर, आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 80 ते 85 जागा मिळू शकतात, असे भाकितही माने यांनी केले.



वंचित सोडून स्वत:चा पक्ष


लक्ष्मण माने यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या समवेत एकत्र येत त्यांनी वंचित बहुजन आघाडी (VBA) चे संस्थापक सदस्य म्हणून काम केले होते. मात्र,  माने यांनी वंचित बहुजन आघाडी या पक्षापासून फारकत घेत वतःची महाराष्ट्र बहुजन आघाडी सुरू केली. यावेळी, लक्ष्मण माने यांनी आंबेडकरांवर भाजप-आरएसएसच्या हितासाठी काम केल्याचा आरोप करत पक्षात च्या "हुकूमशाही" वृत्ती असल्याचेही त्यांनी म्हटले होते. दरम्यान, त्यांच्या बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे केले नाहीत. 


कसं आहे राज्यातील राखी जागांचं गणित


राज्यातील लोकसभेच्या 48 जागांपैकी 5 अनुसूचित जाती (SC) आणि 4 अनुसूचित जमाती (ST) साठी राखीव आहेत. निवडून आलेल्या 48 खासदारांपैकी 26 मराठा समाजाचे आहेत. 9 च्या इतर मोठ्या तुकड्यांमध्ये इतर मागासवर्गीय, त्यानंतर अनुसूचित जाती (6), अनुसूचित जमाती (4), आणि 3 इतर जातींचा समावेश आहे.