पुणे :   गेल्या काही दिवसांपासून  पुणे आणि परिसरात होणाऱ्या संतधार पावसामुळे (Pune Rain) धरणात पाणीसाठा वाढला. खडकवासला धरणात साडे चार टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. या धरणातून पुणे शहर आणि ग्रामीण भागाला पाणीपुरवठा  होतो. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पात 4.35  टिएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे गेल्या सहा दिवसांमध्ये पाऊण टीएमसी पाणी वाढले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे शहरातील पाणी कपातीचे संकट तुर्तास टळले आहे. 


यंदा राज्यात मान्सून वेळीआधीच दाखल झाला असला तरी अद्याप समाधानकारक पाऊस झाला नव्हता. परिणामी मागील महिन्यात धरणांनी तळ गाठला होता.  पण गेल्या एका आठवड्यापासून पुणे शहरात आणि जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पात 4.35  टिएमसी पाणीसाठा झाला आहे. 


पुण्यातील चार धरणाक किती पाणीसाठा?


पुणे शहर आणि जिल्ह्याला चार धरणांनी पाणी पुरवठा होतो ज्यामध्ये खडकवासला, टेमघर, वरसगाव आणि पानशेत यांचा समावेश आहे. सध्या चारही धरणं मिळून एकूण 4.35  टी एम सी पाणीसाठा उपलब्ध आहे.  मात्र मागील वर्षी याच काळात 4 ही धरणक्षेत्रात 5.42 टीएमसी इतका पाणीसाठा होता. 


पुणे जिल्ह्यातला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा (टक्केवारी)



  • खडकवासला: 41.01  टक्के

  • टेमघर: 3.05 टक्के

  • वरसगाव: 10.39 टक्के

  •  पानशेत: 19.67  टक्के


जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज


मोसमी पावसासाठी पोषक वातावरण असल्यामुळे जुलै महिन्यात राज्यासह देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे. जुलै महिन्यात देशभरात सरासरीच्या 106 टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. राज्यात कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे जर पाऊस चांगला राहिला तर शहरावर असलेली पाणीकपातीची टांगती तलवार बाजूला होईल आणि जिल्ह्यातील बळीराजाला सुद्धा उत्तम दिवस येतील हे मात्र नक्की.


पेरणीच्या कामांना वेग


दरम्यान, ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे, त्या भागात शेतीच्या कामांना वेग आला आहे. शेतकरी पेरणी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, अनेक भागात अद्याप चांगला पाऊस झालेला नाही. त्या भागात चांगल्या पावसाची गरज आहे. शेतकरी पावसाची प्रतिक्षा करत आहेत. दरम्यान, चांगला पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी कर नये असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे.  


हे ही वाचा :


Akola News : ऐन पावसाळ्यात जलसंकट अधिक गडद; 1 जुलैपासून 'या' शहराला आठवड्यातून केवळ एक दिवस पाणीपुरवठा