Continues below advertisement

पुणे : शहराच्या वाघोली (pune) भागातील एका प्रसिद्ध शाळेच्या (School) शिक्षिकेने विद्यार्थ्याला कानशिलात लावली आणि थेट शाळेतून काढून टाकले. हा मार इतका जोरात होता की विद्यार्थ्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी कानाला झालेल्या दुखापतीबाबत वैद्यकीय अहवाल दिला आहे. घडलेल्या प्रकारामुळे पालक विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं असून संबंधित शाळेने आता स्पष्टीकरण दिलं. तसेच, संबंधित शिक्षिकेवर कारवाई देखील करण्यात आल्याचं सांगितलं आहे. मात्र, पालकांच्या आक्रमक भूमिकेकडेही त्यांनी बोट दाखवलं आहे. तर, पालकांनी शाळेविरुद्ध पोलिसात (Police) तक्रार दाखल केली आहे. 

शाळेतील शिक्षकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना केलेल्या मारहाणीचे अनेक उदाहरणं तुम्ही पाहिले असतील, कदाचित अनुभवले सुद्धा असतील. पुण्यात सुद्धा एक नवीन उदाहरण पाहायला मिळतं आहे. पुण्यातील वाघोली परिसरात असलेल्या चैतन्य टेक्नो स्कूलमध्ये सातवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षिकेने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी विद्यार्थ्याच्या आईने वाघोली पोलस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Continues below advertisement

फिर्यादी यांच्या म्हणण्यानुसार, 17 सप्टेंबर रोजी सकाळी 7.30 च्या सुमारास त्यांच्या 12 वर्षीय मुलाला शिक्षिका तृप्ती सक्सेना यांनी कानशिलात मारल, ज्यामुळे त्याच्या कानाला दुखापत झाली. त्यानंतर विद्यार्थ्याला वेदना वाढल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी कानाला झालेल्या दुखापतीबाबत वैद्यकीय अहवाल दिला आहे. Interval टाइम म्हणजेच रिसेसनंतर विद्यार्थी वर्गात न गेल्यामुळे त्या शिक्षिकेने त्यांच्या मुलाला मारले. शाळेच्या मुख्याध्यापकांकडे तक्रार करनही कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे. याउलट मुलाला वर्गातून बाहेर काढण्यात आले. या प्रकरणी वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज हांडे यांनी दिली.

पालक-शिक्षक संघटनेचा संताप

दरम्यान, पालकांचा आरोप आहे की, शाळेच्या शिक्षिकेच्या मारहाणीमुळे मुलाला गंभीर मानसिक धक्का बसला असून त्याच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. सध्या मुलावर हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्यामुळे आता वाघोली पोलिस शाळेवर कारवाई करणार का हे पाहावे लागेल. दुसऱ्या बाजूला, ही घटना अतिशय निंदनीय असून शिक्षकांना विद्यार्थ्यांवर त्यांना शिस्त लागावी यासाठी ओरडायचा आणि रागवायचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, त्यांनी कुठल्याही प्रकारचं गैरकृत्य किंवा मारहाण करू नये, असं मत पालक शिक्षक संघटनेच्या पुणे शहराचे अध्यक्ष जयश्री देशपांडे यांनी केले आहे.

पाल्याने शिक्षिकेला सर्वांसमोर मारावे ही पालकांची भूमिका - शाळा (Pune school notice)

शाळा व्यवस्थापनाने या घटनेची दखल घेऊन शिक्षिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आणि याला उत्तर पण त्या महिला शिक्षिकेने दिल आहे. शाळेने महिला शिक्षिकेवर कारवाई केली खरी मात्र शाळेने पालकांच्या आक्रमक भूमिकेवर सुद्धा दावा केला आहे. शाळेने जारी केलेल्या पत्रकात असे म्हटलं आहे की, "पालकांची आक्रमक भूमिका होती की, त्यांच्या पाल्याने शिक्षिकेला सगळ्यांसमोर मारावे. मात्र, आम्ही संबंधित विद्यार्थ्याच्या पालकांना बोलवून त्यांना शाळेचा दाखला घेऊन जाण्यास सांगितलं आहे, असे स्पष्टीकरण शाळेनं दिलं आहे.

पालकाने आरोप फेटाळले

दरम्यान, शाळेनं पत्रक जारी करत पालकांवर गंभीर आरोप केला असून हे अत्यंत लाजीरवाणं आहे. कारण, पालकांनी तशी कुठलाही मागणी शाळेकडे केली नव्हती. शाळा प्रशासनाकडून हे तिसरी घाणेरडं पाऊल उचलण्यात आलं आहे. पहिले म्हणजे विद्यार्थ्यास मारहाण, दुसरं म्हणजे विद्यार्थ्याचा दाखला देणे आणि आता तिसरं हे की खोटे आरोप करणे, असे विद्यार्थ्याचे पालक विवेक यादव यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले.