पुणे: पुण्यातील कर्वे नगर परिसरात मैल मिश्रित पाणीपुरवठा झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संपूर्ण परिसरात घाणेरड्या पाण्याचा पाणीपुरवठा करण्यात आला आहे. दूषित पाण्यामुळे जुलाब, उलटी, ताप, त्वचारोग यांसारख्या आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याने त्यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.

नवीन जलवाहिनी टाकण्याची मागणी

कर्वेनगर परिसरातील भुजबळ बंगल्यासमोरील गायकवाड चाळ परिसरात काल (रविवारी, ता १८) मुख्य जलवाहिनीतून मैलामिश्रित पाण्याचा पुरवठा झाला. पाणी येण्याच्या वेळी सकाळी परिसरातील अनेक घरांमध्ये दूषित पाणीपुरवठा झाल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली आहे. महापालिका प्रशासनाने ही समस्या सोडविण्यासाठी तातडीने नवीन जलवाहिनी टाकण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.

काळसर, घाण वास येणारे पाणी

काही घरांमधील नळांमधून काळसर, घाण वास येणारे पाणी आले. या पाण्यात मैल्याचे अंश स्पष्टपणे दिसत असल्याचे नागरिकांनी संताप व्यक्त केला. दूषित पाण्यामुळे जुलाब, उलटी, ताप, त्वचारोग यासारख्या आजार होण्याची शक्यता आहे. यामुळे महापालिका प्रशासनाविरोधात परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत पाणीपुरवठा विभागाने तातडीने जलवाहिनीची पाहणी करून दूषित पाणीपुरवठा रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

त्याचबरोबर परिसरातील नागरिकांनी प्रशासनाने याची गंभीर दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. नवनिर्वाचित नगरसेविका रेश्मा बराटे यांनी जाऊन गायकवाड चाळीत जाऊन या समस्येची पाहणी केली. दूषित पाणीपुरवठा रोखण्यासाठी त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना उपापयोजना करण्याच्या सूचना दिल्या. तसेच नागरिकांना पाण्याचे जारही उपलब्ध करून दिले आहेत. 

परिसरातील जलवाहिनी दुरुस्ती काम सुरू

कर्वेनगर परिसरातील भुजबळ बंगल्यासमोरील गायकवाड चाळीतील दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांकडून मिळाली असून, या जलवाहिनीची पाहणी करण्यात आली आहे. या ठिकाणी ड्रेनेज लाइनच्या चेंबरमधून काही नळजोड गेले असून, ते गंजल्याने जीर्ण झाले आहेत. हे नळजोड बंद करण्यात आले आहेत. या ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू असून आज सोमवारी (दि.१९) सकाळी पाणी आल्यावर जलवाहिनीत मैलापाणी कसे जाते ते समजेल. त्यानंतर पुढील उपाययोजना करण्यात येतील. हे काम होईपर्यंत नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या कनिष्ठ अभियंता अपर्णा देसाई यांनी दिली आहे.