पुणे: पुणे शहरातील नामांकित दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा जीव गेल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालय (Dinanath Mangeshkar Hospital) प्रशासनाने रुग्णाकडे उपचारांसाठी दहा लाखांची मागणी केली होती. महिलेला प्रसूतीच्या कळा सुरू झाल्यानंतर या महिलेस दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आणण्यात आले होते. हातात असलेले अडीच लाख भरायला तयार असतानाही महिलेला दाखल करून घ्यायलाही रुग्णालय प्रशासन तयार झाले नाही. शेवटी इतर रुग्णालयात हलवत असताना महिलेला त्रास झाला. अखेर जुळ्या मुलांना जन्म देऊन आईचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तनिषा सुशांत भिसे असे जीव गेलेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. पुण्यातील नामांकित रुग्णालयाला जीवापेक्षा पैसा महत्त्वाचा आहे का? असा सवालही उपस्थित केला जात आहे. त्यांना दहा लाख रूपये भरायला सांगितलेली ती रिसीट देखील आता समोर आली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गर्भवती महिलेच्या नातेवाईकाला 10 लाख डिपॉझिट भरण्यास सांगितल्याची रीसीट समोर आल्यानंतर अनेकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने तनिषा भिसे पैशांच्या हव्यासापोटी उपचारात अडवणूक केल्याने एका महिलेला जीव गमावावा लागला. पैशांअभावी हॉस्पिटलने गेटवरूनच गर्भवतीला परत पाठवल्याने आणि ऐन वेळी रुग्णवाहिका मिळू न शकल्याने महिलेचा नाहक बळी गेला. वेळीच उपचार मिळाले असते तर जन्मताच दोन नवजात बाळांनी आपली आई गमावली नसती, अशा शब्दांत दीनानाथ रुग्णालयाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. प्रसूती वेदना तीव्र होऊ लागल्याने महिलेला खासगी गाडीने 25 किलोमीटर अंतरावरील रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तिनं जुळ्या मुलींना जन्म दिला, मात्र, वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने तिची तब्येत खालावली. तिला पुन्हा दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले. मात्र, त्या रुग्णालयात दाखल करताच गर्भवती महिलेचा मृत्यू झाला.
या प्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नी मोनाली उर्फ ईश्वरी ऊर्फ तनिषा भिसे यांना प्रसूती वेदना होत होत्या. सुशांत यांनी पत्नीला पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेले. त्यावेळी त्यांच्याकडे 10 लाखांची मागणी करण्यात आली. त्यावर अडीच लाख रुपये आता तातडीने भरतो. उपचार सुरू करा, अशी विनंती सुशांत भिसे यांनी केली. पण, रुग्णालयाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. यात गर्भवतीची तब्बेत खालावली आणि जीव गेला. काही मंत्री, आमदार यांनीही रुग्णालय प्रशासनाला फोन केले. परंतु प्रशासन कोणाचं ऐकलं नाही. प्रसूती वेदना वाढल्याने नाईलाजानं सुशांत यांनी वाकड येथील सूर्या हॉस्पिटलमध्ये तनिषा यांना नेण्याचा निर्णय घेतला. मात्र तातडीने अॅम्ब्युलन्सही उपलब्ध झाली नाही. शेवटी खासगी गाडीनेच त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. सूर्या हॉस्पिटलमध्ये त्यांची सिहोरीनद्वारे प्रसुती झाली. तनिषा यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला. मात्र, त्यांची तब्येत ढासळल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयामध्ये हलवण्यास सांगितलं. त्यानुसार जवळच्या मणिपाल रुग्णालयात तनिषा यांना दाखल करण्यात आले. तोपर्यंत त्यांनी आपला जीव गमावला.
भिसे कुटूंबामध्ये एकीकडे दोन-दोन लेकींच्या जन्माचा आनंद होता, तर दुसरीकडे त्यांनी जन्मतःच आई गमावल्याची घटना जीव पिळवटून टाकणारी आहे. या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांसह पुणे शहर हादरून गेले आहे. योग्य उपचार न मिळाल्यामुळेच तनिषा यांचा मृत्यू झाल्याचा आरोप गर्भवतीचे पती सुशांत भिसे यांनी केला आहे. भिसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दीनानाथसारख्या नामांकित रुग्णालयाने पैशांपेक्षा माणुसकी जपली असती तर दोन लहान लेकी आज आईपासून दुरावल्या नसत्या. पण, मंगेशकर रुग्णालयाने पैशाला जास्त महत्व दिलं. त्यामुळे एका तरुण आईचा जीव गेला आहे. यामुळे संतापाची लाट उसळली आहे.
नेमके घडले काय?
पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे.. प्रसूतीचा त्रास होत असणाऱ्या तनिषा भिसे यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते. मात्र उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णाला दहा लाख रुपयांची मागणी केली. इतके पैसे अचानक कसे आणायचे असा प्रश्न गर्भवती महिलेच्या कुटुंबीयांना पडला. अखेर अडीच लाख भरायला तयार असतानाही रुग्णालय प्रशासनाने गर्भवती महिलेला प्रसुतीसाठी दाखल करून घेतलं नाही. परिणामी तिला इतर रुग्णालयात हलवण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. दुसऱ्या रुग्णालयात हलवत असताना महिलेला त्रास झाला. या महिलेचे पती सुशांत भिसे हे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक आहेत. रुग्णालयात पत्नीला दाखल करून घेत नाहीत म्हणल्यावर दीनानाथ रुग्णालयाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून रामेश्वर नाईक यांनी फोन केला. तरीही रुग्णालय प्रशासनाने त्यांचं ऐकलं नाही. परिणामी गर्भवती महिलेने दोन गोंडस जुळ्या मुलांना जन्म दिला मात्र महिलेचा जीव गमावला. या घटनेबाबत आमदार अमित गोरखे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारही केली आहे.