Pune Love Jihad : देशभर 'द केरला स्टोरी' चित्रपटाची आणि लव्ह जिहादची चर्चा सुरु असताना पुण्यातील मंचरमधूनही अशीच एक घटना समोर आली आहे. मंचरमधून अल्पवयीन मुलीला 2019 मध्ये पळवून घेऊन जात तिच्याशी मुस्लिम मुलाने लग्न केलं. 2019 पासून या मुलीचा शोध सुरु होता, मात्र अखेर ते दोघेही मंचरमध्ये परतल्याने आणि त्यात तिचं लग्न जावेद शेख सोबत झाल्याचं समोर आल्यानंतर हे लव्ह जिहादचं प्रकरण असल्याचा दावा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केल्यानं खळबळ उडाली आहे. 


नेमकं काय घडलं?


पुण्याच्या मंचरमधून अल्पवयीन मुलीला घेऊन पळालेला तरुण चार वर्षांनी परतला आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. 22 मे 2019ला हे दोघे मंचर सोडून गेले होते. मुलीच्या कुटुंबीयांनी ती हरवल्याची तक्रार ही दाखल केली. मात्र तिचा शोध लागत नव्हता. ते पसार झाले होते. तेव्हा मुलगी अकरावीत शिकत होती, तर मिळेल ते काम करणारा जावेदचं दहावीपर्यंत शिक्षण झालं होतं. अशा परिस्थितीत दोघे घर सोडून गेले होते. महाराष्ट्रासह सुरत आणि उत्तरप्रदेशात त्यांनी चार वर्षे काढली. या ठिकाणी विविध कंपन्यांमध्ये काम करून उदरनिर्वाह केला. या दरम्यान ती सज्ञान झाली आणि दोघांनी कोर्ट मॅरेज करत निकाहनामा ही केला.


चार वर्षांनी मंचरमध्ये परतले!


त्यानंतर तब्बल चार वर्षानी ते मंचरमध्ये परतले. आठवड्याभरानंतर कुटुंबियांना ती गावात आल्याचं समजलं, त्यांनी पोलिसांना याबाबत सांगितलं. मग पोलिसांनी तिला बोलावून घेतला आणि वैद्यकीय चाचणीसाठी तिला रुग्णालयात पाठवलं, तिथं डॉक्टरांनी काही प्रश्न विचारले असता. तिच्या बोलण्यातून हा घडला प्रकार समोर आला. मग पोलिसांनी तिच्याकडे अधिकची चौकशी केली, तेव्हा मी माझ्या मर्जीने जावेद सोबत निघून गेल्याचं आणि लग्न केल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी जावेदला अटक केली असून 363 सह 376 आणि पॉस्कोच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या जावेद येरवडा तुरुंगात आहे.


मुलाच्या आईवडिलांवर कारवाई होणार का?



या सगळ्या प्रकारात मुलाच्या कुटुंबियांचादेखील समावेश आहे, असं बोललं जात आहे. मात्र 2019 मध्ये हे दोघे पळून गेले होते. त्यावेळी आईवडिलांकडे मुलासंदर्भात चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी मुलगा घरी नसल्याचं आणि त्याच्याशी आमचा काहीही संबंध नसल्याचं आईवडिलांनी सांगितलं होतं. या प्रकरणी आता त्यांच्या आईवडिलांचीदेखील सखोल तपास करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.