H3N2 Virus in Pune : देशात सगळीकडे  H3N2 या विषाणू पसरला आहे. त्यात आता पुण्यातही  H3N2 या विषाणूमुळे  बाधा झालेले रुग्ण आढळले असल्याने पुणेकरांवर काळजी घेण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत पुण्यात H3N2 या विषाणूचे 22 रुग्ण आढळले आहेत. जानेवारी ते मार्च या दरम्यान पुणेकरांना बाधा झाली आहे. त्यामुळे आता पुण्यात पुन्हा मास्क लावून फिरायची वेळ येते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वाधिक रुग्ण 19 ते 60 या वयोगटातले आहेत. (Maharashtra News) याबाबत एनआयव्हीने तसा अहवाल दिला आहे.


पुण्याच्या नायडू हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आलेल्या 109 संशयित रूग्णांचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. H3N2 संदर्भात आता खासगी रूग्णालयांनाही सूचना देण्यात आल्या आहेत.  H3N2 हा व्हायरल फ्लू असून हा विषाणू H1N1 विषाणूचं म्युटेशन म्हणजे बदललेला प्रकार आहे. व्हायरल H3N2 इन्फ्लूएंझामुळे देशात आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटक आणि हरियाणामध्ये प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली आहे. राष्ट्रीय कोविड टास्क फोर्सचे नेतृत्व डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं की, नागरिक कोविड उपायांचं पालन करु आणि लसीकरण करु शकतात. 


H3N2 व्हायरसचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारने H3N2 व्हायरस संदर्भात महत्त्वाची बैठक घेतली. राज्यांचा सूचना करण्यात आल्या आहेत. या बैठकीत आरोग्यमंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. तसेच महाराष्ट्रातही याचे रुग्ण वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. महाराष्ट्रातील वैद्यकीय यंत्रणांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली. 


लवकरात लवकर उपचार करा...
शहरात सध्या व्हायरलची म्हणजेच H3N2  या व्हायरसची साथ असून, रुग्णांची संख्या वाढली आहे. रुग्णांनी मास्क वापरावा, वेळोवेळी हात धुवावेत, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, साधा आहार घ्यावा, पाच दिवस आराम करावा, घरातील इतर व्यक्तींच्या संपर्कात येऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा, कोरोना काळात ज्या प्रकारे काळजी घेतली, त्या प्रकारे रुग्णांनी काळजी घ्यावी, असं आवाहन डॉक्टरांकडून केलं जात आहे.


मास्क वापरा...
कोरोनापासून सुटका झाली असली तरीही आता H3N2 या नवीन व्हायरसने सर्वांची चिंता वाढवली आहे. विशेष म्हणजे हा व्हायरस झापाट्याने पसरत असून लोकांमध्ये दहशत दिसून येत आहे. तर H3N2  या व्हायरसमुळे देशात दोघांचा बळी गेलाय. त्यामुळे केंद्र सरकार सतर्क झाले असून, सरकारने देशात नवीन नियमावली जाहीर केल्या आहेत. ज्यात गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.