Maharashtra Political Crisis :   राज्य सरकारची उद्या बहुमत चाचणी पार पडणार आहे. यासाठी दोन्ही बाजूंनी मत द्यायचं आहे. त्यासाठी प्रत्येक पक्ष खबरदारी म्हणून आपल्या आमदारांना मुंबईत बोलावत आहेत. मात्र पिंपरी चिंचवडमधील भाजपचे आजारी  असलेले आमदार लक्ष्मण जगताप यांना अद्याप पक्षांकडून कोणताही निरोप आलेला नाही. अशी माहिती आमदार बंधू जगतापांनी दिली आहे. बहुमत चाचणीसाठी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विशेष अधिवेशन होणार आहे. मात्र जगतापांची तब्येत पाहता ते दिवसभर उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यामुळं जगताप उद्याच्या बहुमत चाचणीला हजर राहणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.


राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला होता. यानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या राजकीय खेळीची चर्चा सगळीकडे होती. या सगळ्या निवडणुकीत   भाजपच्या दोन आमदारांची चर्चा होती. आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार मुक्ता टिळक हे दोन्ही आमदार आजारी असल्याने मतदानासाठी मुंबईत उपस्थित राहणार की नाही?, असा प्रश्न  राजकीय वर्तुळात रंगत होता. मात्र पुण्याच्या या दोन्ही आमदारांनी मुंबईत जाऊन मतादानाचा हक्क बजावला होता. मात्र आता दोघे मतदानासाठी मुंबईत जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. राज्यपालांनी विधीमंडळ सचिवांनाही पत्र पाठवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सुप्रीम कोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे. सरकारला 30 जून रोजी बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. 


एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसह उद्या मुंबईत 


राज्यातील सत्तासंघर्ष दिवसेंदिवस आणखी गडद होत चालला आहे. शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्यामुळे महाविकास आघाडी सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. शिवसेनेतील प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काही आमदारांसह केलेल्या बंडामुळं राज्यात राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. सध्या एकनाथ शिंदे आणि सर्व आमदार आसाममधील गुवाहाटी येथे वास्तव्याला आहेत. तसेच, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडून बंडखोर आमदारांना वारंवार परत येण्याचं आवाहन केलं जात आहे. दरम्यान एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसह उद्या मुंबईत येणार असून, बहुमत चाचणीसाठी येणार असल्याची शिंदेंनी माहिती दिली आहे